सांगली : ‘टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतोच’, अशा आशयाची पोस्टर्स सांगली शहरात सर्वत्र झळकत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या छायाचित्रासह लागलेली ही पोस्टर्स सध्या चर्चेचा विषय ठरली असून, आता कुणाचा ‘कार्यक्रम’ होणार, याची उत्सुकताही ताणली गेली आहे.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महाआघाडीच्या उमेदवारांनी भाजपचा मोठ्या फरकाने पराभव केला. भाजपचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जात होते. भाजपवरील विजयाने महाआघाडीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. या विजयात जयंत पाटील यांचा मोठा वाटा आहे. पाच जिल्ह्यात महाआघाडीची मोट बांधत प्रचार यंत्रणा सक्रिय केली होती. महाआघाडीचा हा प्रयोग यशस्वी ठरल्याने दोन्ही काँग्रेससह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतही सध्या उत्साह संचारला आहे.
आता सांगली शहरात जयंत पाटील यांचे छायाचित्र असलेली पोस्टर्स सर्वत्र झळकत आहेत नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यावर कोणत्याच पक्षाचे, व्यक्तीचे नाव नाही. केवळ ‘टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतोच’, असा मजकूर आहे. त्यामुळे आता जयंत पाटील कोणाचा ‘कार्यक्रम’ करणार? महिन्याभरात महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडी होणार आहेत. महापालिकेतही भाजपच्या सत्तेला जयंतराव सुरूंग लावणार का? याची चर्चा शहरात रंगली आहे.