सांगली : टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जत तालुक्यातील वंचित ६५ गावांना म्हैसाळच्या विस्तारित योजनेतून पाणी देण्यात येणार आहे. यासाठी मेच्या पहिल्या आठवड्यात मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलाविल्याचेही त्यांनी सांगितले.
विस्तारित जत सिंचन योजना आणि अपूर्ण टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेच्या प्रश्नावर सांगली पाटबंधारे कार्यालयात शनिवारी आढावा बैठक झाली. या बैठकीत जलसंपदामंत्री पाटील बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता एम. जे. नाईक, उपअधीक्षक अभियंता अमर सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, कार्यकारी अभियंता अभिनंदन हारूगडे, सचिन पवार, सूर्यकांत नलवडे, कुमार पाटील, राजन डवरी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, सिंचन योजनांच्या मोकळ्या जागेत आणि कालव्यावर सौरऊर्जेचा प्रकल्प उभारल्यास वीज खर्चात बचत होणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करून मंत्रालयात पाठवावा, त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल. जत तालुक्यातील पूर्णतः वंचित ४८ गावे व अंशतः वंचित १७ गावांसाठी ८३८ कोटींची नवी विस्तारित योजना तयार केली आहे. विस्तारित जत उपसा सिंचन योजना नावाने प्रस्तावित योजनेसाठी मूळ म्हैसाळ योजनेतील टप्पा क्रमांक तीन (बेडग)मधून थेट पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी पाच टीएमसी राखीव पाण्याची तरतूद असेल. त्यातून ६५ गावांतील २० हजार २४३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. योजनांच्या अपूर्ण कामांसाठी निधीही उपलब्ध करून देण्यात येईल.
क्षारपड जमिनीसंदर्भात कवठेपिरान, डिग्रज, बोरगाव, आष्टा, उरुण- इस्लामपूर या गावांचे सर्व्हे पूर्ण असून, प्रती हेक्टरी खर्च शासनास सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
चौकट
पाणीपट्टी वसुलीचे नियोजन करा
जयंत पाटील म्हणाले, सिंचन योजनांचे पाणी वाटप व पाणीपट्टी वसुलीबाबत योग्य नियोजन करावे. टंचाईच्या काळात पाणी देण्यासाठी त्याचा साठा करण्याबाबत नियोजन करावे. पाणीपट्टी वसुलीकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास सिंचन योजना सुरळीत चालणे कठीण होणार आहे.