लोकमत न्यूज नेटवर्क
करगणी : आटपाडी तालुक्यामध्ये विनापरवाना वाळूसह अन्य साहित्याची अतिअवजड वाहतूक करणाऱ्या राजपथ कंपनीच्या वाहनांवर कारवाई करा, अशी मागणी आटपाडी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली. याबाबतचे निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विनानंबरप्लेट वाळू व इतर साहित्य वाहतूक करणारी वाहने आहेत. अतिअवजड वाहनांमुळे अनेक ठिकाणी अपघात झाले आहेत.
राजपथ कंपनीची वाहतूक करणारी वाहने ही क्षमतेपेक्षा जास्त भरली जात आहेत. परिणामी लहान वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाने तातडीने कारवाई करावी; अन्यथा आटपाडी तालुका मनसेच्या वतीने रस्त्यावर उतरून मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मनसे जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान पिंजारी, मनसे आटपाडी तालुका वाहतूकचे अध्यक्ष दाजीराम खिलारी, कृषी सेल अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी निवेदन दिले आहे.