लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : विधी महाविद्यालयातील मर्यादित कोट्यामुळे खुल्या प्रवर्गातील हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याची तक्रार मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना शनिवारी सांगलीत निवेदन दिले.
विद्यार्थ्यांनी व सावंत यांनी सांगितले की, विधी व न्याय शिक्षणक्रमासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पुरेसा प्रवेश कोटा उपलब्ध नाही. महाराष्ट्रभरात सुमारे पाच हजारहून अधिक खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. विविध आरक्षणातून शिल्लक राहिलेल्या मोजक्याच जागांवर प्रवेश मिळतो. या शाखेचे शिक्षण घेण्याची इच्छा असतानाही मर्यादित कोट्यामुळे अन्य शाखेकडे वळावे लागते. त्यामुळे राज्यभरात विधी महाविद्यालयांचा प्रवेश कोटा वाढवावा.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी बोलून तुकड्या वाढविण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.