सांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमधील भानगडींमुळे व्यथित झालेल्या काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी प्रमुख पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. पालिकेतील भानगडी थांबविण्यासाठी महिन्याभराची मुदत दिली आहे. तुमच्या कारभारामुळे आमची बदनामी होते. भानगडी थांबविल्या नाहीत, तर नेतृत्व सोडू, असा इशाराही पाटील यांनी दिल्याचे समजते. महापौर हारूण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी जयश्रीताई पाटील यांनी पालिकेच्या कारभाराबाबत बैठक घेतली. गेल्या काही महिन्यांपासून पालिकेतील भानगडींमुळे सत्ताधाऱ्यांची बदनामी होत आहे. त्यात पक्षांतर्गत गटबाजीमुळे अनेक भानगडी चव्हाट्यावर येत आहेत. त्याची दखल घेऊन जयश्रीताई पाटील यांनी बैठक बोलाविली होती. काँग्रेसच्या काही नगरसेवकांसह मदनभाऊ गटातील कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कारभाराबाबत पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. यात घनकचरा प्रकल्पांतर्गत यंत्रसामग्री खरेदी, भूसंपादनाची नुकसानभरपाई या विषयांवर विशेष जोर होता. त्याशिवाय महासभा व ऐनवेळच्या विषयातून होणारा बाजारही चर्चेच्या केंद्रस्थानी होता. मदन पाटील असताना पालिकेतील कारभारी भानगडी करायचे, पण नेहमीच मदनभाऊंनी त्यांच्या कारभाराकडे दुर्लक्ष केले होते. त्याचे राजकीय परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसमधील सर्वच नगरसेवकांनी जयश्रीतार्इंना नेतृत्व करण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार पालिकेची जबाबदारी जयश्रीतार्इंनी स्वीकारली आहे. पण त्यानंतरही पालिकेतील भानगडी थांबलेल्या नाहीत. नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जयश्रीतार्इंनी पालिकेच्या कामकाजाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)कारभार तुमचा, बदनामी आमचीतुमच्या कारभारामुळे आमची बदनामी होते. लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. महिन्याभरात कारभार सुधारा, भानगडी थांबवा, अन्यथा महापालिकेचे नेतृत्व सोडू, अशा शब्दात त्यांनी पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
भानगडी थांबवा, अन्यथा नेतृत्व सोड
By admin | Updated: June 16, 2016 01:11 IST