कसबे डिग्रज : कृष्णा, वारणा नदीच्या महापुरामुळे आपल्या भागाचे नुकसान झाले आहे. पंचनामे होत आहेत. नुकसानाबाबत राज्य सरकार पाठीशी आहे, असे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. मिरज पश्चिम भागातील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, कवठेपिरान व दुधगाव या पूरग्रस्त भागातील महापुराच्या आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते.
पाटील म्हणाले की, महापुरामुळे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे शासकीय नियमानुसार केले जात आहेत. महापुरामुळे स्थलांतरित झालेल्यांनाही मदत केली जाणार आहे. याबाबतीत निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे लवकरच सुरू केली जाणार आहेत. पंचनाम्याबाबत अडचणी असतील तर संबंधित तलाठ्याशी संपर्क साधा. महापुरामुळे नुकसान झालेला एकही लाभार्थी मदतीपासून वंचित राहणार नाही.
यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार डी. एस. कुंभार, अपर तहसीलदार अर्चना पाटील, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, मंडल अधिकारी विजय तोडकर, सरपंच किरण लोंढे, गीतांजली इरकर, भालचंद्र पाटील, आनंदराव नलवडे, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, उपसरपंच संजय निकम, रमेश काशीद उपस्थित होते.