सांगली : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यांत मुसळधार पाऊस आणि महापुराने हाहाकार उडवलेला असताना पूर्व भागातील सहा तालुक्यांत मात्र पाऊस बेपत्ता आहे. मिरज, वाळवा, पलूस व शिराळा तालुकेच पूरस्थितीत आहेत.
जत, कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव, आटपाडी व तासगावमध्ये पाऊस गायब झाला आहे. जत, कवठेमहांकाळ, आटपाडीत खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. तेथील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही अद्याप रिकामेच आहेत. जतच्या उमदी, संख भागात तर यंदाच्या पावसाळी हंगामात दमदार पाऊस एकदाही झालेला नाही. मिरज तालुक्याचा पश्चिम भाग महापुराला तोंड देत असताना पूर्व भागाला मात्र चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. सध्याचा पाऊस खरिपासाठी पुरेसा असला तरी पाणीसाठ्यांसाठी मात्र दमदार पाऊस अपेक्षित आहे. १ जूनपासून जत तालुक्यात ३४७.६ मिमी, तासगावमध्ये ३८१ मिमी, मिरजमध्ये ४६४.५ मिमी, खानापूर, विट्यामध्ये फक्त ३१० मिमी, कवठेमहांकाळमध्ये ३१४, कडेगावमध्ये ४०३.७ मिमी पाऊस झाला आहे. तुलनेने शिराळ्यात तब्बल १,२७० मिमी, वाळव्यात ६२३ मिमी पाऊस झाला आहे. पलूस तालुक्यात आजवर ४९६.९ मिमी पाऊस झाला.
चौकट
परतीच्या पावसावरच भरवसा
जिल्ह्याच्या पूर्व भागाची तहान परतीच्या पावसावरच भागते. पहिल्या टप्प्यातील पाऊस अपवाद वगळता कधीच धो-धो बरसत नसल्याचा या तालुक्यांचा अनुभव आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात महापुराने हाहाकार माजविलेला असताना निम्मा जिल्हा मात्र दृष्काळसदृश स्थितीत असल्याचे विरोधाभासाचे चित्र आहे.