अर्जुन कर्पे -कवठेमहांकाळ -तासगाव-कवठेमहांकाळच्या राजकीय कुरूक्षेत्रावर राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे. बेरजेच्या आणि वजाबाकीच्या राजकारणाला गती येऊन राजकीय व्यूहरचनेस सुरुवात झाली आहे. महांकाली कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे यांनी खा. संजयकाका पाटील व अजितराव घोरपडे यांच्या राजकीय कार्यक्रमाला अलविदा करत गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्याशी पुन्हा राजकीय याराना केला आहे, तर राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत, शिवबंधनात अडकलेले जयसिंगराव शेंडगे यांनी खा. पाटील आणि घोरपडे यांच्याशी नवी राजकीय दुनियादारी सुरू केल्याने, तालुक्याचे राजकारण नव्या वळणावर येऊन ठेपले आहे.कवठेमहांकाळ तालुक्याला राजकीय संघर्ष नवा नाही. येथील ‘महांकाली’च्या पांढरीने अनेक राजकीय उलथा-पालथी पाहिल्या, पचवल्या व टोकाचा संघर्षही झेलला. पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आश्रयाला असणाऱ्या माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी भाजपचे खा. पाटील यांच्या सहकार्याच्या बळावर रणशिंग फुंगले असून फौजफाटा जमवण्यास सुरुवात केली आहे. घोरपडे यांनी रात्र न् दिवस वाड्या-वस्त्यांवर बैठका-भेटी देऊन मतदारसंघ ढवळून काढला आहे. गतवर्षी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तालुक्यातील काही ठिकाणी सगरे-घोरपडे आणि काका यांनी एकत्रित आघाडी करून आबांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. कवठेमहांकाळ ग्रामपंचायतीवर या त्रिकुटाने झेंडा फडकवत आबा गटाला जोरदार धक्काही दिला होता. मधील काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. सध्या सगरे आणि आबांमधील बेबनाव संपुष्टात आला आहे.नुकताच कवठेमहांकाळ ग्रामपंचायतीच्या वतीने ‘भारत निर्माण योजने’च्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या होर्डींग्जवर काका, घोरपडे, सगरे आणि शेंडगे यांची एकत्रित छायाचित्रे झळकल्याने तालुक्यात वेगळ्याच चर्चेला उधाण आले. परंतु या कार्यक्रमाला सगरे यांनी हजेरी लावली नाही. सगरे समर्थक ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच चंद्रकांत सगरे यांनीही अनुपस्थित राहून राष्ट्रवादीशी व आबांशी ‘राजकीय याराना’ घट्ट असल्याचे संकेत दिले. या कार्यक्रमाला जयसिंगराव शेंडगे यांनी मात्र हजेरी लावली होती.एकूणच तालुक्यातील सध्याच्या राजकारणाचा विचार करता, शेंडगे-घोरपडे-काका यांची नवीन राजकीय मैत्री जनतेच्या पचनी पडणार, की सगरे आणि आबांची राजकीय यारीच ‘लय भारी’ ठरणार, याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. बदलते राजकारणशिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले जयसिंगराव शेंडगे यांनी भारत निर्माण योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून, तालुक्यात घोरपडे-काका-शेंडगे या नव्या राजकीय समीकरणाची नांदी केली. शेंडगे आणि घोरपडे यांचा टोकाचा राजकीय संघर्ष गेली वीस वर्षे तालुक्याने पाहिला आहे. विधानसभा संघर्षात एकदा शिवाजीराव शेंडगे यांची सरशी झाली, तर तब्बल तीन वेळा घोरपडेंनी बाजी मारली. या संघर्षात तालुक्यातील जनताही भरडली गेली. परंतु राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र असू शकत नाही, हेच राजकीय सूत्र खरे ठरले आहे.
आबा-काकांच्या संघर्षाला तीव्र धार
By admin | Updated: August 29, 2014 23:14 IST