जिल्हा परिषदेतर्फे आयोजित सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे उद्घाटन अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी दीपप्रज्वलनाने केले. यावेळी सभापती आशा पाटील, विजयसिंह जाधव आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ग्रामपंचायतींनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी केले. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामपंचायतींसाठी आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
ग्रामीण भागातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी निवडक ८९ गावांमध्ये विशेष प्रकल्प जिल्हा परिषदेतर्फे राबविला जात आहे. त्यासाठी ९० कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. त्याविषयी गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवकांना कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्ष कोरे यांनी दीपप्रज्वलनाने तिचा शुभारंभ केला. त्या म्हणाल्या, प्रशिक्षणातून मिळालेल्या माहितीचा उपयोग ग्रामपंचायतस्तरावर प्रकल्प राबविण्यासाठी करावा. सांडपाण्याचे व्यवस्थापन न झाल्याने अनेक गावे विविध आरोग्य समस्यांना तोंड देत आहेत, त्याचे निराकरण या मोहिमेतून यशस्वीरीत्या करण्याचा प्रयत्न सरपंचांनी केला पाहिजे. शिक्षण सभापती आशा पाटील यांनीही प्रकल्प योग्यरीतीने राबविण्याचे आवाहन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, जिल्ह्यातील प्रकल्प राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल यासाठी प्रयत्न करुया. यासाठी ग्रामपंचायतींना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी जबाबदारी माझी राहील. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून, तो यशस्वीपणे राबविण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
कार्यशाळेत प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे टप्पे, उपक्रम, अंमलबजावणीची पद्धती याविषयी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव यांनी मार्गदर्शन केले.
गटविकास अधिकारी, उपअभियंते, शाखा अभियंते, विस्तार अधिकारी, गटसंसाधन कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक आदी सहभागी झाले. पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने आयोजन केले.
----------