विटा/कडेगाव : मराठा समाजाचे आरक्षण व हक्कासाठी सुरू असलेली ही चळवळ अखंडपणे चालू ठेवण्याचा निर्धार करीत मंगळवार, दि. २७ सप्टेंबर रोजी सांगली येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा रेकार्ड ब्रेक करण्याचा निर्धार विटा, कडेगाव येथे रविवारी मराठा सभेच्या बैठकीत घेण्यात आला. राजकारण, गट-तट व आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून सर्व मराठा बांधव हजारोंच्या संख्येने या बैठकीला एकत्रित आले होते. विटा येथील जय मल्टिपर्पज हॉलमध्ये सांगली मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, नगराध्यक्ष वैभव पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास बाबर, सूतगिरणीचे अध्यक्ष अमोल बाबर, तालुका संयोजन समितीचे निमंत्रक विजय पाटील, जिल्हा नियोजन समितीचे संजय देसाई, डॉ. संजय पाटील उपस्थित होते. यावेळी आमदार अनिल बाबर म्हणाले, मराठा समाज क्रांती मोर्चे राजकीय नाहीत. उत्स्फूर्तपणे या मोर्चांचे आयोजन होत आहे. आमच्यासारख्या राजकीय मंडळींनी अशा व्यासपीठापासून लांब राहिले पाहिजे. राजकीय मंडळी बाजूला राहूनही अशाप्रकारे शक्ती तयार होत आहे. अशी एकजूट बघण्याचे भाग्य आम्हाला मिळत आहे. यावेळी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी समाजाच्या प्रश्नांवर सर्वांनी एकत्र येणे चांगली बाब आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर शिष्यवृत्तीच्या विषयाबाबत होणारा अन्याय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पाहात आहोत. या गोष्टी टाळण्यासाठी मराठ्यांनी एकजुटीने लढले पाहिजे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आम्ही एकत्र येतोय. पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास बाबर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित समाज व्यवस्था घडवण्यासाठी मराठ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. केवळ पाच टक्के मराठा समाज आर्थिकदृष्टया सक्षम आहे. परंतु उर्वरीत समाज नांगराचा फाळ खांद्यावर घेऊन जगतो. हाच समाज देशावर संकट आल्यानंतर त्याच नांगराची ढाल-तलवार करून लढवावे, असे आवाहन केले. मराठा क्रांतीचे खानापूर तालुका संयोजन समितीचे विजय पाटील म्हणाले, इतर समाजांना आरक्षण देणारे आम्ही आहोत. आता आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण मिळवण्यासाठी लढावे लागत आहे. सांगलीतील मोर्चा रेकॉर्ड ब्रेक होईल. त्यामध्ये सर्वात मोठा सहभाग खानापूर तालुक्याचा असेल. सांगली जिल्हा नियोजन समितीचे संजय देसाई म्हणाले, मराठ्यांनी पराक्रम करायचा आणि तो दुसऱ्यांचा नावावर नोंदला जायचा. यापुढील काळात असे होणार नाही. मराठा क्रांती मोर्चा सांगलीच्या आयोजनासाठी वेबसाईट तयार करण्यात आली आहे. यामध्ये के वळ दोन दिवसात दीड लाख नोंदणी झाली आहे. तर सव्वालाख लोक व्हॉटस्-अॅप ग्रुपच्या माध्यमातून जोडले गेले आहेत, असे सांगून शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, क्रांतिसिंह नाना पाटील यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, यासाठी ही बिगर राजकीय चळवळ उभा राहिली आहे. सरकार उद्योगांना मदत करते, मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याचे धोरण घेता येत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी एकत्र आले पाहिजे. या मोर्चाच्या नियोजनाबाबत डॉ. संजय पाटील यांनी माहिती दिली. स्वागत शंकर मोहिते यांनी केले. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मनमंदिर उद्योग समूहाचे नेते अशोक गायकवाड, शंकर मोहिते, समीर कदम, अमित भोसले, विकास जाधव, सुशांत देवकर, राजू जाधव, पंचायत समितीचे उपसभापती किसन सावंत, नगरसेवक विशाल पाटील, दहावीर शितोळे, पृथ्वीराज पाटील, नगरसेवक अशोक कदम, सुमित गायकवाड, विनोद पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, नंदकुमार पाटील, संजय सपकाळ, विजय सपकाळ, रवींद्र कदम, हर्षल निकम, विलास कदम उपस्थित होते. कडेगाव : मराठा क्रांती मोर्चात कडेगाव तालुक्यातून ५० हजाराहून अधिक मराठा समाजबांधव सहभागी होेणार आहेत. यासाठी कडेगाव तालुक्यातील राजकीय नेते मोहनराव कदम आणि पृथ्वीराज देशमुख यांनी सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करणार असल्याचे सांगितले. कडेपूर (ता. कडेगाव) येथील राजवीर मंगल कार्यालयात सांगलीच्या मोर्चाच्या नियोजनासाठी रविवारी मेळावा झाला. या मेळाव्यात मराठा सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष विजयसिंह महाडिक, महाराष्ट्र मराठा स्वराज्य संघाचे राज्य अध्यक्ष महादेव साळुंखे, संजय पाटील, महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील, ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, डॉ. जितेश कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विजयसिंह महाडिक म्हणाले, सांगली येथे ९ लाख मराठा समाजबांधव मोर्चात सहभागी होतील. राज्यात जिल्हास्तरीय मोर्चा झाल्यानंतर मुंबई येथे कोट्यवधी मराठे जाऊन मोर्चा काढतील. यात सर्व संघटना, सर्व मराठा नेते आणि मराठा बांधव सहभागी होतील. दादासाहेब यादव यांनी प्रास्ताविक केले. सुनील जगदाळे, सुरेश घार्गे, अॅड. प्रमोद पाटील, राहुल पाटील, सतीश पाटील, मोहनराव यादव, वैभव शिंदे, राजाराम गरूड, आशा पाटील, सुशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भीमराव मोेहिते, सुरेश मोहिते, इंद्रजित साळुंखे, समरजित गायकवाड, सुनील मोहिते, हर्षवर्धन थोरात, विजय शिंदे, सुरेश यादव, शाहीर यादव, सुनील गाढवे, सखाराम सूर्यवंशी, दीपक भोसले आदी उपस्थित होते. नेताजी यादव यांनी आभार मानले. (वार्ताहर)
सांगलीचा मराठा क्रांती मोर्चा विक्रमी ठरणार
By admin | Updated: September 12, 2016 00:24 IST