संजयनगर : सांगली शहरातून धुळगाव (ता. मिरज) येथे जाणाऱ्या शेरी नाल्याच्या जलवाहिनीला पुन्हा गळती लागली आहे. जुना बुधगाव रस्त्यावरील गायत्रीनगर येथे जलवाहिनीस गेल्या आठ दिवसांपासून गळती लागल्याने परिसरातील घरांमध्ये व अंगणात पाणी शिरले आहे.
पाण्याचा निचरा व्हावा म्हणून परिसरातील नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांकडे पाठपुरावा केला; परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. दुसऱ्या बाजूला या समस्येबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणी दाद घेत नाहीत असे स्थानिक नगरसेवक सांगत असल्याने नागरिकांची गोची झाली आहे. मोठ्या प्रमाणात डासांची वाढ होत असून, साथीच्या आजारांचा फैलाव होण्याची शक्यता आहे. शहरांमध्ये सर्वत्र स्वच्छता अभियान राबविले जात असताना या ठिकाणी मात्र स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत.
चाैकट
आंदोलनाचा इशारा
या भागात काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी दोन नगरसेवक आहेत. त्यांनी या भागाकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांनी सांगितले. येत्या आठ दिवसांमध्ये सांडपाण्याचा निचरा न झाल्यास महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
फोटो ओळ : सांगलीतील जुना बुधगाव रस्त्यावरील गायत्रीनगरमध्ये शेरी नाल्याच्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात सांडपाणी साठले आहे.
छाया : सुरेंद्र दुपटे