तांदूळवाडी : ग्रामीण भागातील खेडोपाडी गावागावांमध्ये वाचन चळवळ गतिमान होणे गरजेचे आहे. यासाठी शासनाच्या वतीने ग्रंथालय व वाचनालय यांना अनुदान देऊन वाचन चळवळ वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी गाव तेथे वाचनालय व ग्रंथालय निर्माण होणे महत्त्वाचे असून यासाठी वाचकवर्गाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. धनाजी उर्फ संदीप अच्युतराव कदम यांनी केले.
कुंडलवाडी (ता. वाळवा) येथील यशवंतराव चव्हाण सार्वजनिक वाचनालय नवीन जागेत स्थलांतरित करण्यात आले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी कदम बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष तानाजी नारू कदम होते.
सध्या वाचन चळवळीला जास्तीत जास्त महत्त्व आहे. यामुळे जगामध्ये होणाऱ्या घडामोडी व विविध विषयांचे ज्ञान प्राप्त होते. यामुळे वाचनालये व ग्रंथालये निर्माण होणे गरजेचे आहे.
कार्यक्रमास माजी सरपंच दिलीप कदम, जगन्नाथ नलवडे, राजू कदम, सौरभ कदम, छोटू गुलुगडे यांच्यासह मान्यवर व वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन संस्थापक अध्यक्ष विजयकुमार कदम यांनी केले.