बोरगाव : आम्ही अनेकवेळा सत्तेच्या बाहेर होतो. त्याला आम्ही कधीच डगमगलो नाही. सत्ता लवकरच आपल्याकडे येईल, तोपर्यंत आपण एकदिलाने व प्रामाणिकपणाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहणार असल्याचे मत माजी केंदीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बोरगाव (ता. वाळवा) येथील हिंदमाता शिक्षण संकुलाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमात व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंत पाटील होते.पवार पुढे म्हणाले, शेतीबरोबर आधुनिक शिक्षणाकडे वळण्याची गरज असून, शेती एके शेती करण्याचे दिवस आता राहिले नाहीत. त्यासाठी उच्च विद्याविभूषित होऊन तरुणांनी स्वत:बरोबर देशाचाही नावलौकिक करावा. ११५ कोटी लोकसंख्येच्या देशात ६० टक्के लोक आज शेती करत आहेत. जमीन क्षेत्र कमी होऊ लागले, शेतीवर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या वाढत गेली. याला प्रगती म्हणावी का? शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असून आम्ही आठ महिन्यात कारखान्याला गाळपासाठी पाठवणारे उसाचे वाण विकसित करीत आहोत. या बदलामुळे आमची अर्थव्यवस्था नक्की बदलेल यात शंका नाही. यासाठी ऊस वाणावर संशोधन करण्यासाठी एक समिती इंडोनेशियाला पाठवली आहे.जयंत पाटील म्हणाले, नव्या गोष्टींचा ध्यास व आदर्श ठेवण्याचे काम या गावाबरोबर परिसराने कायम दाखवून दिलेले आहे. माझ्या ३८ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत प्रेरणा व प्रेमाची सावली या गावाने दिली. संस्थेचे मानद सचिव माणिकराव पाटील म्हणाले, विधायक नेतृत्व पाठीशी राहिल्याने आज मी गावात शिक्षणाची गंगा आणू शकलो, असे मत व्यक्त केले. स्वागत विष्णुपंत शिंदे यांनी केले, तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष मारुती पाटील यांनी मानले. संस्थेचे अध्यक्ष रामराव देशमुख यांचा व संस्थेस जागा दिल्याबद्दल मुरारराव शिंदे यांचा सत्कार पवार यांच्याहस्ते केला. यावेळी भगतदादा पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, खंडेराव जगताप, विनायक पाटील, बाळासाहेब लाड, बी. एस. पाटील, विक्रम पाटील, बाबासाहेब मुळीक, सहसचिव संजय पाटील, अभिजित पाटील, विश्वजित पाटील, शामराव पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
राज्यातील सत्ता लवकरच आपल्याकडे येईल
By admin | Updated: November 25, 2015 00:32 IST