विद्यार्थ्यांना अकरावीचा प्रवेश कोणत्या गुणवत्तेवर मिळणार, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. राज्य परीक्षा महामंडळाने अद्याप असा निर्णय घेतलेला नसताना बोर्डाने आततायीपणा का केला, असा प्रश्नही विचारला आहे. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्दचा निर्णय जाहीर केला. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. जिल्ह्यात २३ शाळांमध्ये १३०० विद्यार्थी दहावीत शिकतात. बारावीनंंतर चांगल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळावा म्हणून सीबीएसईचे पालक दहावीपासूनच मुलाची चांगली तयारी करून घेतात. २३ नोव्हेंबरपासून ऑफलाईन वर्ग सुरू झाले. लॉकडाऊन काळात शाळांची व शासनाची बससेवा बंद होती, त्यामुळे या वर्गांसाठी पालकच मुलाला शाळेत घेऊन गेले. अभ्यासासाठी स्वत: खस्ता खाल्ल्या, मात्र बोर्डाने या पालकांचीच दांडी उडविली आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये मुलांनी दिवसभरात चार-पाच तास मोबाईलवर घालविले. मान मोडून अभ्यास केला. या सर्वांना बोर्डाने धक्का दिला आहे.
मुलाची गुणवत्ताच सिद्ध झाली नाही तर अकरावीला कोणत्या निकषावर त्यांना प्रवेश देणार, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. शाळांनी अंतर्गत गुण द्यायचे आहेत, पण त्यातून विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी स्पष्ट होणार, अशीही विचारणा केली आहे.
चौकट
अकरावीचे प्रवेश कोणत्या निकषावर ?
अकरावी प्रवेशासाठी कोणती गुणवत्ता यादी गृहीत धरणार याचे स्पष्टीकरण सीबीएसई बोर्डाने केलेले नाही, त्यामुळे पालक संभ्रमात आहेत. चांगल्या शिक्षणक्रमासाठी व महाविद्यालयासाठी आग्रही असणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मिळेलच याची हमी नाही. शाळांना वीस गुण अंतर्गत स्वरूपात देता येतात, त्यामुळे एकाही शाळेत विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण केले जाण्याची शक्यता नाही. त्याचा ताण अकरावी प्रवेशावर पडणार आहे. अकरावीसाठी अनैसर्गिक स्पर्धा निर्माण होणार आहे.
चौकट
गुणदान समपातळीवर कसे आणणार ?
शिक्षकांना विद्यार्थ्याच्या वर्षभरातील क्षमतेनुसार गुणदान करावे लागेल; पण यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे व पात्रतेनुसार गुणदान होईल याची हमी बोर्ड देत नाही. गुणवत्ता यादीच नसल्याने विद्यार्थ्यांचे वास्तव मूल्यांकन होणार नाही. यामुळे अभ्यासू विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. आयटीआय, पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशातही हे विद्यार्थी मागे पडण्याची भीती आहे.
पालकांत तीव्र संताप
परीक्षा नाही तर दहावी कसली? मुलगा दररोज शाळेत जात असला तरी त्याची गुणवत्ता परीक्षेने सिद्ध होते. मुलाला परीक्षेच्या शर्यतीत सोडायचे नसले तरी त्याचे मूल्यांकन होणे महत्त्वाचे आहे. पुढील शिक्षणासाठी त्याचा कल कळणार नाही. दहावीनंतर वेगवेगळ्या विद्याशाखा सुरू होतात, त्यासाठी दहावीची परीक्षा महत्त्वाची आहे. बोर्डाने परीक्षा रद्द करून मुलांवर अन्याय केला आहे.
- श्रीहरी व्हावळ, पालक
बोर्डाने परीक्षा रद्द केल्याने जणू वर्षभराचा अभ्यास वाया गेला आहे. गुणवत्तेसाठी कसून अभ्यास सुरू होता, आता त्याचा उपयोग होणार नाही. बारावी व स्पर्धा परीक्षांसाठी दहावीचा अभ्यास महत्त्वाचा असतो; पण परीक्षा रद्द केल्याने हा पाया ठिसूळ राहणार आहे. कोरोना असला तरी बोर्डाने धीर धरायला हवा होता.
- श्रुती खंदारे, पालक
बोर्डाने कोरोनाची तीव्रता कमी होईपर्यंत प्रतीक्षा करायला हवी होती. जुलै-ऑगस्टमध्ये परीक्षा घेता आल्या असत्या. वर्षभर मन लाऊन अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय झाला आहे. अकरावीचा प्रवेश कसा घ्यायचा असा प्रश्न आमच्यापुढे आहे. पुढची शिक्षणाची दिशा ठरविणेदेखील मुश्कील झाले आहे. थोडा अभ्यासक्रम कमी करून परीक्षा घेणे शक्य होते.
- अमित करमुसे, पालक
बोर्डाने परीक्षा रद्द केल्याने पालकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. वर्षभर केलेल्या अभ्यासाचे फलित काय, असा प्रश्न ते विचारत आहेत. विद्यार्थीही निराश आहेत. उच्च शिक्षणासाठी दहावीची परीक्षा दिशादर्शी असते, त्यामुळे ती रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा आहे.
- इंदिरा पाटील, प्राचार्या
पाईंटर्स
सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी
मुले - ८६०
मुली - ६८०