कवठेमहांकाळ : आयुष्यभर शेतीत काबाडकष्ट करून देशाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षांनंतर पेन्शन देण्यासाठी आपण राज्यात व्यापक मिशन राबवून न्याय देणार आहोत. ‘आता एकच मिशन, शेतकऱ्यांना पेन्शन’, अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज, शनिवारी येथे केली.गृहमंत्री पाटील कवठेमहांकाळ तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, शेती देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. या शेतीवर देशातील कोट्यवधी लोक उपजीविका करतात; परंतु शेतीत राबणारा शेतकरी मात्र हलाखीचे व गरिबीचे जीनव जगत आहे. उतारवयात कुटुंबात सांभाळ होत नसल्याने या शेतकऱ्याचे जीवन उघड्यावर पडते. त्यामुळे पुढच्या काळात राज्यातील शेतकरी हलाखीचे जीवन जगू नये, त्याचा उत्तरार्थ सुखाचा जावा, यासाठी त्याला वयाच्या साठ वर्षांनंतर पेन्शन देण्यात यावी, याकरिता युध्दपातळीवर प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे.शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, यासाठी आटपाडी तालुक्यात आबा सरगर नावाच्या शेतकऱ्याने उपोषण सुरू केले आहे. त्यांची ही व्यथा राज्य सरकारकडे मांडून ही मोहीम सार्थ करून दाखवू. १९९४ मध्ये आपण शेतकऱ्यांच्या पेन्शनसाठी आवाज उठविला होता. तो तडीस नेण्याची आज संधी मिळाली आहे. ती सार्थ करून दाखवू असेही ते म्हणाले. (वार्ताहर)
आता एकच मिशन, शेतकऱ्यांना पेन्शन
By admin | Updated: July 6, 2014 00:01 IST