सांगली : जिल्ह्यातील ७५९ संस्थांच्या अवसायनाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. या सर्व संस्थांना आता अंतरिम नोटिसा बजावण्यात आल्या असून येत्या ८ डिसेंबर रोजी सांगलीतील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात यासंदर्भात सुनावणी ठेवण्यात आली आहे. बिनकामाच्या सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करून उर्वरित संस्थांच्या गुणात्मक वाढीकडे लक्ष देण्याच्यादृष्टीने ही मोहीम सहकार विभागाने हाती घेतली आहे. या मोहिमेत ज्या सहकारी संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळून येणार नाहीत किंवा ज्यांचा कोणताही ठावठिकाणा नाही, त्यांच्यासंदर्भात जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून त्या संस्था बंद असल्याबाबतची खातरजमा करण्यात आली. पूर्णपणे बंद असलेल्या व कार्यस्थगित संस्था अवसायनात घेण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा उपनिबंधकांनी यापूर्वीच दिल्या आहेत. तालुकास्तरावरून अंतरिम नोटिसा बजावण्यात आल्या असून काहींनी अनुदानाअभावी संस्थांचे काम रखडल्याचे म्हणणे मांडले आहे. अशाप्रकारे ज्या संस्था शासकीय अनुदानाअभावी किंवा अन्य शासकीय गोष्टींमुळे सुरू होऊ शकल्या नाहीत, अशांना आणखी संधी दिली जाण्याची चिन्हे आहेत. उर्वरित संस्था येत्या डिसेंबरअखेर अवसायनात घेतल्या जाणार आहेत. यामध्ये मोठ्या संस्थांचाही समावेश आहे. ज्यांना नोटिसांबाबत म्हणणे मांडायचे आहे, त्यांनी कागदपत्रांसह जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ८ डिसेंबर रोजी सुनावणीसाठी हजर राहावे, असे आदेश जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनी दिले आहेत. त्यामुळे किती संस्थांकडून अंतरिम नोटिसांबाबत म्हणणे सादर होणार, याकडे सहकार विभागाचे लक्ष लागले आहे. तरीही नोटिसा बजावण्यात आलेल्यांपैकी जवळपास ९0 टक्के संस्था अवसायनात निघण्याची शक्यता आहे. नोटिसा बजावलेल्यांमध्ये मिरज तालुक्यातील संस्थांची संख्या अधिक आहे. (प्रतिनिधी)अवसायन प्रक्रिया सुरूसांगली जिल्ह्यात ३० सप्टेंबरला सर्वेक्षण पूर्ण करून सहकार विभागाने अहवाल सादर केला आहे. यामध्ये ४०८९ संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी केवळ ३ हजार ३३० संस्थाच चालू स्थितीत आढळून आल्या. त्यामुळे उर्वरित ७५९ सहकारी संस्था आता अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील ७५९ संस्थांना पुन्हा नोटिसा
By admin | Updated: November 24, 2015 00:24 IST