सांगली : निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरविण्याची काँग्रेसची परंपरा नाही. राष्ट्रवादीने तसा विचार केला असेल आणि त्यांनी उमेदवार निश्चित केला, तर आम्ही त्याचे स्वागत करू, असे मत वनमंत्री पतंगराव कदम यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले, राज्यात एकत्रित निवडणुका लढविताना ज्याचे आमदार जास्त त्यांना मुख्यमंत्रीपद देण्याची परंपरा चालत आली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी कधी या पदाचा उमेदवार ठरविण्याची पक्षाची परंपरा नाही. अजून आघाडीबाबतचा निर्णयही झालेला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जर राष्ट्रवादीने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निश्चित केला, तर त्याचे आम्ही स्वागतच करू. अधिवेशन संपल्यानंतर आम्ही लगेचच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागणार आहोत. तालुकानिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांची व जनतेची मते अजमावण्यात येतील. लोकांचा कल ओळखूनच उमेदवारीबाबत निर्णय घेतले जातील. सांगली जिल्ह्यातही अधिवेशन संपल्यानंतर बैठकांचा धडाका सुरू होईल. सर्वांना विश्वासात घेऊनच उमेदवारीचे निर्णय घेतले जातील. लोकसभा निवडणुकीत देशभरातच मोदी लाट होती. त्यामुळे वेगळा निकाल लागला. तशी परिस्थिती विधानसभेला नाही. राज्यात काँग्रेस आघाडी सरकारला चांगले वातावरण आहे. आम्ही त्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू. निवडणुका एकत्रित लढवायच्या की स्वतंत्रपणे, याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याने त्यावर भाष्य करणार नाही. तरीही विधानसभेच्या तयारीला आम्ही लागणार आहोत. (प्रतिनिधी)
निवडणूकपूर्व मुख्यमंत्री ठरत नाही
By admin | Updated: June 9, 2014 00:57 IST