मिरज : मिरज पूर्व भागातील सर्व तलाव पिण्याच्या पाण्यासाठी म्हैसाळ योजनेतून मोफत भरून देण्याची मागणी राष्ट्रवादीतर्फे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली. पालकमंत्र्यांनी पाटबंधारे विभागास तलावात पाणी सोडण्याबाबत सूचना दिल्या.
गतवर्षीप्रमाणे म्हैसाळ योजनेतून मिरज पूर्व भागातील सर्व तलाव पिण्याच्या पाण्यासाठी भरण्यात आले होते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात रोजगार, व्यापार बंद आहे. शेतीमालाला भाव नाही, पैसे नसल्याने विजेचे बिल भरणे व पाणी बिल भरणे शेतकरी, नागरिकांना अशक्य आहे. त्यामुळे मिरज पूर्व भागातील सर्व तलाव पिण्याच्या पाण्यासाठी म्हैसाळ योजनेतून मोफत भरून देण्यात यावेत. सद्य:स्थितीत मिरज पूर्व भागात पाण्याची पातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. पाझर तलाव कोरडे ठणठणीत असल्याने पिण्याच्या पाण्याच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. मिरज पूर्व भागात अनेक गावांत नागरिक पाण्यासाठी भटकत आहेत. नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक गावातील पाझर तलाव मोफत भरून द्यावेत. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार असल्याचे विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. प्रमोद इनामदार व कार्याध्यक्ष गंगाधर तोडकर यांनी निवेदनात म्हटले आहे.