लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : वारणा डावा कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनींचा योग्य मोबदला न दिल्याच्या निषेधार्थ नाटोली ता. शिराळा येथील शेतकऱ्यांनी वारणा डावा कालव्याचे काम शनिवारी बंद पाडले. तहसीलदार गणेश शिंदे यांनी याबाबत वरिष्ठ पातळीवर तातडीने बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
माजी मंत्री शिवाजीराव नाईक, युवा नेते सत्यजित देशमुख, सुखदेव पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेतली. २०१० च्या दरम्यान नाटोली शेतकऱ्यांच्या वारणा कालवा प्रकल्पासाठी जमिनी संपादित करण्यात आल्या. शासनाने या जमिनींसाठी प्रतिगुंठा ८१० रुपये दराने मोबदला जाहीर केला होता. हा मोबदला शासनाच्या संबंधित कार्यालयात त्या-त्या शेतकऱ्यांच्या नावे आला होता. परंतु हा मोबदला योग्य नसल्याने संबंधित काही शेतकऱ्यांनी तो स्वीकारला नाही. त्यानंतर २०२० पर्यंत म्हणजे गेली १० वर्षे या कालव्यांची कामे बंदच होती. परंतु गेल्या महिनाभरापासून कामे संबंधित विभागामार्फत पुन्हा मार्गी लागली आहेत.
माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले, शासनाच्या नवीन धोरणानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदारांना दिल्या आहेत.
सत्यजित देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांना जमिनीचा अल्प मोबदला हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. जोपर्यंत योग्य निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहू.
चौकट
मंगळवारी तातडीची बैठक
माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, सुखदेव पाटील यांनी उपअभियंता अनिल लांडगे, तहसीलदार गणेश शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा केली. उपअभियंता अनिल लांडगे यांनी वरिष्ठांशी चर्चा करीत यावर तोडगा काढण्याची विनंती केली. त्यानंतर तहसीलदार गणेश शिंदे यांनी, याविषयी भूसंपादनविषयक सर्व माहिती घेऊन, प्रांताधिकारी यांच्यासमवेत मंगळवार दि. ९ मार्च रोजी तातडीची बैठक आयोजित करून तोडगा काढला जाईल, असे शेतकऱ्यांना आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.