सांगली : देवस्थान जमिनींची इनामे खालसा व्हावीत, यासाठी किसान सभेतर्फे कवठेमहांकाळ येथे गुरुवारी (दि. २३) शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. किसान सभेचे सरचिटणीस कॉ. डॉ. अजित नवले मार्गदर्शन करणार आहेत. उपाध्यक्ष उदय नारकर उद्घाटन करतील.
मेळाव्याला उमेश देशमुख, डॉ. विवेक गुरव, शहाजी गुरव आदी उपस्थित राहणार आहेत. शाही दरबार हॉलमध्ये सकाळी ११ वाजता मेळावा सुरू होईल. संयोजकांनी सांगितले की, राज्यातील सात प्रकारची इनामे स्वातंत्र्योत्तर काळात खालसा झाली. सध्या फक्त देवस्थान आणि महार वतन इनामे शिल्लक आहेत. देवस्थान इनामे खालसा होऊन शेतजमिनीसंबंधित शेतकऱ्यांच्या मालकी नोंदी व्हाव्यात यासाठी किसान सभा अनेक वर्षे संघर्ष करत आहे. पण, शासन आणि महसूल विभाग गुंतागुंत निर्माण करत आहे. शेतकऱ्यांना जमिनीतून हाकलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कब्जेदार असतानाही इतर हक्कात नावे नोंदविली जात आहेत. इतर हक्कातील नावे सातबारा पत्रकातून काढून टाकण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. त्यामुळे देवस्थान इनामे रद्द करावीत, अशी किसान सभेची मागणी आहे.