सांगली : महापालिकेत एकहाती सत्ता असूनही स्थायी समितीचे सभापतीपद विरोधी गटाकडे गेले, ही गंभीर आहे. पदाधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडल्याचे दिसत नाही. त्यामुळे लवकरच महापालिकेत मला मोठे ‘आॅपरेशन’ करावे लागेल, असा इशारा काँग्रेसचे नेते आ. पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला. ते म्हणाले की, महापालिकेत आमचे संख्याबळ अधिक आहे. विरोधी पक्षाचे संख्याबळ कमी असताना त्यांना सभापदी मिळाले. महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेत्यांची यामध्ये जबाबदारी मोठी होती. त्यांनी ती व्यवस्थित पार पाडली का, हे पाहावे लागेल. महापालिकेत मोठे बदल करावे लागतील. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याकडूनही सोमवारी कामकाजाचा आढावा घेतला. रस्त्यांसाठी आलेल्या निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे, अशा सूचना त्यांना दिल्या आहेत. रस्त्यांची कामे प्राधान्याने व्हावीत. दर्जा नियंत्रणासाठी चांगली यंत्रणा उभी करायला हवी. आयुक्तांनी या गोष्टी करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे महापालिकेत यापुढे तरी चांगला कारभार अपेक्षित आहे. जिल्हा परिषदेसाठी आम्ही जोरदार तयारी केली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीचे भानुदास पाटील आमच्याकडे आल्यामुळे काँग्रेसची तालुक्यातील ताकद वाढली आहे. तालुकानिहाय आमचे नियोजन सुरू आहे. अन्य पक्षांतील अनेक लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेसाठी चांगले वातावरण तयार झाले आहे. नगरपालिका निवडणुकीमुळे कार्यकर्तेही चार्ज झाले आहेत. नागरिकांमध्ये विद्यमान सरकारबद्दल नाराजी आहे. त्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसलाच मिळणार, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)ग्रामीण अर्थव्यवस्था विस्कळीतनोटा बंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने दिलेला आर्थिक निर्बंधाचा कालावधी येत्या चार दिवसात संपणार आहे. तरीही ग्रामीण परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. लोकांचे हाल सुरूच आहेत. जिल्हा बँकेवरील निर्बंधामुळे त्यात भरच पडली आहे. उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत असताना, त्यांना पैसे हातात मिळत नाहीत. हे या निर्णयाचे मोठे अपयश आहे. अन्य घटकांपेक्षा शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे ते म्हणाले. समविचारी पक्षांना एकत्र करणारकाँग्रेस जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढणार आहे. स्थानिक पातळीवर जे समविचारी घटक, पक्ष किंवा आघाड्या आहेत, त्यांनाही आम्ही सोबत घेणार आहोत. त्यासाठीची चाचपणी सुरू आहे. आष्टा आणि इस्लामपूर येथील नगरपालिका निवडणुकीत आम्ही समविचारी पक्षांना एकत्रित घेऊन केलेला प्रयोग यशस्वी झाल्याने तसे प्रयत्न जिल्हा परिषदेसाठी काहीठिकाणी होतील. औषध मिळणेही झाले मुश्किलनोटा बंदीच्या निर्णयामुळे अजूनही लोकांच्या अडचणी दूर झालेल्या नाहीत. अनेक लोकांना औषधे खरेदी करणेही मुश्किल झाले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचे हे हाल पाहवत नाहीत. भारती हॉस्पिटलमार्फत आम्ही मोफत औषधांचा उपक्रम त्यासाठी सुरू केला आहे. आणखी किती दिवस अशी परिस्थिती राहील, याचा अंदाज कोणालाच नाही.
महापालिकेत मोठे ‘आॅपरेशन’ करू
By admin | Updated: December 27, 2016 00:59 IST