लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्या तत्कालीन मुस्लिम नेत्यांचा इस्लामपूर शहरातील मुस्लिम समाजावर प्रभाव होता. आता राष्ट्रवादीमध्ये मुस्लिम नेत्यांची संख्या जास्त असली, तरी त्यांचा प्रभाव नाही. माजी नगरसेवक पीरअली पुणेकर पंधरा वर्षे नेतृत्व करीत आहेत. परंतु गेल्या साडेचार वर्षात ते पालिकेत सक्रिय नाहीत.
इस्लामपूर शहरात मुस्लिम समाजाच्या मतदारांची संख्या दहा ते बारा हजार आहे. पूर्वी सरकारनियुक्त युसूफ सावकार हे पहिले नगराध्यक्ष होते. त्यानंतर राजारामबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हमजाशेठ दिवाण उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मुनीर पटवेकर यांनी तर नगराध्यक्ष पदाची सूत्रे सांभाळली होती. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाच्या नगरसेवकांना मोठ्याप्रमाणात संधी दिली गेली. यामध्ये मुनीर इबुशे, आयुब हवलदार यांसह महिला नगरसेवकांचा समावेश आहे.
सध्या पीरअली पुणेकर १५ वर्षांपासून नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या पत्नी जरीना पुणेकर विद्यमान नगरसेविका आहेत. मात्र त्या केवळ पालिकेतील महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित राहतात, तर पीरअली पुणेकर धार्मिक कार्यक्रमांनाच येऊन फोटोसेशन करण्यापलीकडे काहीच करत नसल्याचे बोलले जाते. रोजा किणीकर राष्ट्रवादीतील महिला आघाडीच्या शहराध्यक्षा आहेत. त्यांनी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे संघटन केले, परंतु मुस्लिम समाजामध्ये त्यांचा प्रभाव फारसा नाही. एमआयएम या संघटनेचे शाकीर तांबोळी यांना जिल्हाध्यक्षपद दिले. त्यांनी प्रारंभीच्या काळात आक्रमकता दाखविली, मात्र आता ती मावळली आहे.
कोट
पंधरा वर्षांत समाजासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. संपर्क कार्यालयही चालू केले आहे. गोरगरिबांच्या मदतीला धावण्यासाठी आमचे कार्यकर्ते तत्पर आहेत. त्यांच्या माध्यमातून पालिकेतील प्रश्न सोडवितो. येथून पुढेही समाजातील आणि प्रभागातील प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न राहतील.
-पीरअली पुणेकर, माजी नगरसेवक
फोटो- १०१२२०२०-आयएसएलएम-पीरअली पुणेकर