लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : नगरपालिका सभागृहात नुकतीच भुयारी गटार योजनेवर वादळी चर्चा झाली. सत्ताधारी-विरोधकांतून आरोप-प्रत्यारोप झाले. या योजनेबाबत अभ्यासपूर्वक चर्चा झाली नसल्याने यामध्ये फक्त राजकारणच असल्याचे दिसून आले. या कामाला गती दिली नाही तर शहरातील इतर विकासाला ब्रेक लागणार आहे.
मागील सत्ताधारी राष्ट्रवादीने भुयारी गटारी योजनेची घोषणा केली. प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला, परंतु राज्यात युती शासन असल्याने त्यात राजकारण झाले, अशी चर्चा होती. त्यामुळे ही योजना पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीने रस्त्यासाठी असलेला ३० कोटींचा निधी वळविला. व्याजासह ही रक्कम ४० कोटींच्या घरात गेली आहे. त्यानंतर पालिकेत सत्ताबदल झाला. नंतर सत्ताधारी विकास आघाडीने भुयारी गटार योजनेच्या प्रस्तावात बदल करून एसटीपीच्या जागा ताब्यात घेऊन भुयारी गटारीच्या कामाचा प्रारंभ करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता शासनाकडून थेट भुयारी गटारी कामाची मंजुरी आणली. कामास प्रारंभही केला. आता या कामाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने स्थगिती दिली आहे.
महाआघाडी सरकारने दहा कोटी रुपये रस्त्यासाठी दिले आहेत. हा निधी भुयारी गटारी योजना पूर्ण झाल्याशिवाय खर्च करू नये, असा मतप्रवाह आहे. भुयारी गटार वेळेत नाही झाली तर हा निधी रस्त्यांसाठी खर्च करण्याची तयारी पालिकेने दर्शविली आहे. शहर आणि उपनगरांतील रस्ते होण्यासाठी भुयारी गटार योजना पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी एसटीपीच्या जागा ताब्यात घेणे गरजेचे आहे. ही कार्यवाही झाली नाही तर भुयारी गटारीचे काम ठप्प होणार आहे. ती योजना वेळेत पूर्ण झाली नाही तर रस्त्यांची कामेही खोळंबणार आहेत.
कोट
येत्या महिन्यात एसटीपीच्या जागा ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर त्वरित भुयारी गटारीचे काम सुरू होईल. येणाऱ्या निवडणुकीपर्यंत भुयारी गटारीची योजना पूर्ण करू.
- विक्रम पाटील, गटनेते, विकास आघाडी