सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद व गुळाचे सौदे सुरु झाले. सकाळी नऊ वाजता कोरोनाविषयक नियमांचे पालन करत सौद्यांसाठी शेतकरी व व्यापारी उपस्थित राहीले.लॉकडाऊनमुळे गेले काही दिवस समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते, गूळ, हळद व बेदाण्याचे सौदेही झाले नाहीत. १ जूनपासून जिल्ह्यातील निर्बंध शिथील होताच समितीने सौदेही सुरु केली. गुरुवारी पहिल्याच दिवशी १ हजार ७७७ क्विंटल राजपुरी हळदीची आवक झाली.
प्रतिक्विंटल कमीतकमी सहा हजार ते कमाल ११ हजार रुपयांचा दर मिळाला. सरासरी दर ८ हजार ७०० रुपये असा राहिला. गूळ सौद्यासाठी ३ हजार ५० क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटल जास्तीजास्त ३ हजार ७७० दर मिळाला. सरासरी दर ३ हजार ४१० रुपये राहिला.दरम्यान, सभापती दिनकर पाटील यांनी सागितले की, निर्बंध १०० टक्के रद्द झाले नसल्याने धान्य व इतर व्यवसाय मर्यादीत वेळेतच सुरु राहतील. धान्य बाजार सकाळी सात ते आकरा या वेळेतच चालेल. त्यानंतर फक्त धान्य उतरवून धेण्याचेच काम चालेले. व्यापारी व ग्राहकांव्यतिरिक्त अन्य खासगी वाहनांना समितीत निर्बंध असतील. फळ मार्केटमध्येही सकाळी ७ ते ११ या वेळेतच सौदे सुरु राहतील. ओळकपत्राशिवाय प्रवेश नसेल. बेदाण्याचे सौदे शुक्रवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत निघणार आहेत.