लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:17 AM2021-06-23T04:17:54+5:302021-06-23T04:17:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबण्यासाठी आरोग्य कर्मचारी वारंवार सांगतात. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबण्यासाठी आरोग्य कर्मचारी वारंवार सांगतात. परंतु अनेकांना लस घेतल्यानंतर केंद्रात बसणे जीवावर येते. लसीची ॲलर्जी असलेल्यांसाठी हा अर्धा तास महत्त्वाचा असतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई महागात पडू शकते.
कोरोना प्रतिबंधित लसीकरणाची व्याप्ती आता वाढली आहे. आतापर्यंत केवळ ४५ वयाच्या वरील नागरिकांनाच लस दिली जात होती. परंतु आता पुन्हा ३० ते ४४ वयोगटातील लसीकरणालाही १९ जूनपासून सुरुवात करण्यात आल्याने लस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्काही आता पुढील काही दिवसातच वाढणार आहे. येणारा आठवडा लसीकरणाचे लाभार्थी वाढविणारा आहे. परंतु लस घेत असताना आरोग्य विभागाकडून सांगण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणेही आवश्यक आहे. बहुतांश लाभार्थी आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रात अर्धा तास थांबणे अत्यंत आवश्यक असताना, काही नागरिक लस घेतल्यानंतर पाच ते दहा मिनिटे थांबतात आणि लगेच निघून जात असल्याचे प्रकार अनेक केंद्रांच्या ठिकाणी समोर येत आहेत.
चौकट
लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?
लसीकरणानंतर अर्धा तास ठेवण्याच्या मागचे कारण म्हणजे कुणाला चक्कर येऊ शकते. कुणाला रिॲक्शन होऊ शकते. कुणाला पुरळ येऊ शकते. त्यामुळे लस घेतल्यानंतर अर्धा तास त्या व्यक्तिला निरीक्षणाखाली ठेवावे लागते.
कोट
लसीकरणानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सूचनेनुसार केंद्रावर काहीवेळ थांबावे लागते. नागरिकांच्या भल्यासाठीच ती सूचना आहे. अद्याप जिल्ह्यात कोणालाही रिॲक्शन आल्याचा प्रकार घडलेला नाही. तरीही काळजी घेतली जात आहे. लस घेणाऱ्यांनीही सुचनांचे पालन करावे.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक, सांगली
चौकट
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
एकूण लसीकरण ७,६०,४२०
पहिला डोस ६,२८,३६६
दुसरा डोस १,३२,०५४
एकूण केंद्र ३,४६२
प्राथमिक आरोग्य केंद्रे २,१३७
चौकट
लस हेच औषध
सध्या लसीकरण हाच एकमेव चांगला पर्याय लोकांसमोर आहे. लसीकरणामुळे मोठे सुरक्षाकवच मिळणार असल्याने नागरिकांनी शक्य तेवढ्या लवकरण लसीकरण करून घेण्याचा प्रयत्न करावा. आता लसही उपलब्ध होत आहे.