लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या सभेत शहरातील विविध बावीस विषयांवर चर्चा करण्यास दोन दिवस लागले. यामध्ये वाहतूक अतिक्रमण हा निर्णय सोडला, तर उर्वरित विषयांवर बिनकामाच्या चर्चेत नगरसेवकांनी तारे तोडून ‘विकासाचा मध्य’ साधला. नगरपालिका सभा आता नेहमीच वादाचे केंद्र बनत आहे.
दोन दिवसांपूर्वी पालिकेच्या सभेसमोर प्रथमच पन्नासहून अधिक विषय ठेवण्यात आले. यामध्ये शहरातील मूलभूत समस्यांवर, विकासकामांवर चर्चा होणे गरजेचे असताना वाहन विभाग, इंधन, रस्त्याचे पॅचवर्क, व्याख्यानमाला, आदी विषय घेऊन सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवक भांडत बसल्याचे दिसले. यामध्ये नागरिकांचे आरोग्य, साथीचे रोग, रस्ते, गटारी, आदी मूलभूत विषयांवर चर्चा आणि ठोस निर्णय झालेच नाहीत. याउलट सत्ताधारी आणि विरोधक वैयक्तिक विषयांवरून वाद-विवाद घालत बसले.
शहराच्या विकासात भुयारी गटार योजना, मुख्य रस्त्याचे नूतनीकरण, स्वच्छता, चोवीस तास पाणी, डेंग्यूसारखे साथीचे रोग आणि उपाययोजना, गुंठेवारी नियमितीकरण, मालमत्ता कर आकारणी, बगीचे, आदी विषय महत्त्वाचे आहेत, पण ते चर्चेत आलेच नाहीत. पोहण्याचा तलाव, चौक सुशोभीकरण, खेळाचे मैदान, आदी विषयही चर्चेतून हद्दपार झाले. याबाबत कोणीही आवाज उठवला नाही.
चाैकट
निवडणूक समोर असूनही...
आगामी पालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्याअगोदर इस्लामपूरचे आदर्श मॉडेल उभे करण्याचा प्रयत्न झाला तरच निवडणुकीला सामोरे जाताना मतदार जाहीरनाम्यावर विश्वास ठेवतील, अन्यथा विश्वास ठेवणार नाहीत, याचे कोणालाही सोयरसूतक नाही!