इस्लामपूर : राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत संपूर्ण इस्लामपूर शहराला हागणदारीमुक्त करण्यासाठी ‘घर तेथे शौचालय’ हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील व माजी नगराध्यक्ष अॅड. चिमण डांगे यांनी दिली.पाटील म्हणाले की, केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्य शासनाने हे अभियान जाहीर केले आहे. या योजनेत शहरातील नागरिकांनी सहभागी होऊन ‘ग्रीन सिटी, क्लीन सिटी’ करण्यासाठी पुढाकार घ्यावा. या अभियानात बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक शौचालयासाठी शासनाकडून १२ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या अभियानातून जवळपास अडीच हजार शौचालये बांधून शहर हागणदारीमुक्त करताना स्वच्छही बनविण्याचा संकल्प आहे.इस्लामपूर नगरपालिकेने यापूर्वी कमी खर्चाच्या वैयक्तिक शौचालय योजनेंतर्गत १८0२ शौचालये बांधून दिली आहेत. शहरात एकूण २८ सार्वजनिक शौचालयांमधून ४२९ युनिट बांधण्यात आली आहेत. स्थानिक नागरिकांच्या व्यक्तिगत आरोग्याच्या हिताच्यादृष्टीने घर तेथे शौचालय असावे, यासाठी शासनाने हाती घेतलेले स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान महत्त्वाचे आहे. घनकचरा संकलन व प्रक्रिया ही योजना पुढच्या टप्प्यात राबविण्याचे प्रयत्न आहेत.यावेळी डांगे म्हणाले, नागरिकांना उघड्यावर शौचासाठी जावे लागू नये यासाठी पालिकेमार्फत सर्वेक्षण करुन घर तेथे शौचालय बांधण्याचा शहर स्वच्छतेचा आराखडा बनविण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी ३0 जूनपर्यंत आपले अर्ज द्यावयाचे आहेत. अर्जाचा नमुना पालिकेतर्फे मोफत दिला जाणार आहे. शहरात सध्या १८ हजार ४२0 मालमत्ताधारक आहेत. त्यापैकी १३ हजार २२६ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये आहेत.आरोग्य सभापती सीमा इदाते म्हणाल्या, घर तेथे शौचालय योजना यशस्वीपणे राबवून स्वच्छ शहर बनविण्याचा संकल्प आहे. शौचालये योग्य व शास्त्रोक्त पध्दतीचा अवलंब करुन बांधली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी ३0 जूनपर्यंत पालिकेकडे आपले अर्ज सादर करुन या योजनेचा लाभ घ्यावा.यावेळी नियोजन सभापती खंडेराव जाधव, नगरसेवक शहाजी पाटील, सदानंद पाटील, शंकरराव चव्हाण, मुख्याधिकारी नीलेश देशमुख, प्रशासन अधिकारी आनंद कांबळे, प्रभारी आरोग्य अधिकारी एन. के. पाटोळे उपस्थित होते. (वार्ताहर)शौचालयांची बांधणी शास्त्रोक्त...स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत बांधण्यात येणारी शौचालये सध्या उपलब्ध असणाऱ्या बांधकाम पध्दतीपेक्षा वेगळ्या दर्जाने बांधली जाणार आहेत. शौचालयाच्या टाकीमधून डासांची उत्पत्ती होऊ नये, तसेच टाकीतील मैल्याचे बायोगॅसमध्ये रुपांतर व्हावे, अशी नवीन पध्दतीची बांधणी या शौचालयामध्ये असणार आहे, असे मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी सांगितले.
इस्लामपुरात ‘घर तेथे शौचालय’ अभियान
By admin | Updated: June 13, 2015 00:15 IST