वाळवा : चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही व आमचे सरकार आहे. पण चुकीचे काम करणाऱ्यांना ते आमचे असले तरी, पाठीशी घालणार नाही. तुमचे काम चांगले आहे. तेव्हा तुम्ही भाजपबरोबर यावे, अशी अपेक्षा सहकार, पणन, वस्त्रोद्योग व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी वैभव नायकवडी यांच्याकडे व्यक्त केली.निमित्त होते क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने वाळवा येथे क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी क्रीडानगरीत आयोजित शालेय राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनाचे.यावेळी चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते स्थापनेपासून हुतात्माला उच्चांकी साखर उताऱ्याबद्दल मिळालेले २६ पुरस्कार, गतवर्षी उसाला उच्चांकी २६३९ रुपये दर दिल्याबद्दल हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांचा सत्कार करण्यात आला.हुतात्मा पॅटर्नचा गौरव करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कमी खर्चात साखर कारखाना उभारून कमी मनुष्यबळ, व्यवस्थापनात काटकसर करून केवळ साखर या एकमेव उत्पादनावर ‘हुतात्मा’ला एफआरपीप्रमाणे एकरकमी दर देणे परवडते, मग इतरांना ते का जमत नाही, याबाबतही विचार होण्याची गरज आहे. स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार होते, परंतु ते उपस्थित राहू शकले नाहीत, याबाबत स्पष्टीकरण देताना पाटील यांनी, भिवंडी येथे महत्त्वाचे काम असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमास येऊ शकले नाहीत, अशी माहिती दिली. आगामी दोन महिन्यात कोणतेही चांगले काम काढा, मी आवर्जून येतो, असा निरोप त्यांनी दिला आहे. तेव्हा ‘मुख्यमंत्र्यांच्या कानात कुणीतरी काहीतरी सांगितले असेल, म्हणून ते आले नाहीत, असा गैरसमज करून कोणी घेऊ नये, अशी मिष्किल टिपणीही त्यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता केली. (वार्ताहर)‘हुतात्मा’ची मदतहुतात्मा साखर कारखान्याच्यावतीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीस १२ लाख ४७ हजार ३७९ रुपयांची मदत देण्यात आली. रकमेचा धनादेश कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, उपाध्यक्षा वंदना माने यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
वैभव नायकवडींना भाजपमध्ये निमंत्रण
By admin | Updated: November 26, 2015 00:17 IST