अशोक डोंबाळे - सांगली -राष्ट्रवादीच्या जत, खानापूर, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला असून, आणखी काहीजण महायुतीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे त्यांचे कट्टर समर्थक असलेले आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले जिल्हा परिषदेचे आठ आणि पंचायत समितीचे बावीस सदस्य या नेत्यांच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत. या सदस्यांवर आघाडीची छाप असली तरी, ते महायुतीचा प्रचार करणार हे निश्चित झाल्यामुळे, काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची गोची होणार आहे.राष्ट्रवादीचे जतचे नेते विलासराव जगताप यांनी लोकसभा निवडणुकीपासूनच भाजपशी जवळीक साधली आहे. जत विधानसभेसाठी भाजपकडे त्यांनी उमेदवारी मागितली आहे. भाजपची उमेदवारी मिळो अथवा न मिळो, जगताप कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणारच असल्यामुळे तेथील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य संजीवकुमार सावंत, रूपाली पाटील, सुशीला होनमोरे आणि पंचायत समितीचे नऊ सदस्य त्यांचाच प्रचार करणार आहेत. राष्ट्रवादीची तेथील गळती रोखून गड शाबूत ठेवण्याची व्यूहरचना गृहमंत्री आर. आर. पाटील करीत आहेत, परंतु जत पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीवरून आर. आर. पाटील यांची खेळी अयशस्वी झाल्याचे दिसत आहे. जगताप यांनी राष्ट्रवादीला धोबीपछाड देत वर्चस्व कायम ठेवले आहे.खानापूर तालुक्यातील चारपैकी किसन जानकर, फिरोज शेख हे दोन जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीमधील आठपैकी सात सदस्य अनिल बाबर समर्थक असून एक सदस्य काँग्रेसचा आहे. हे सर्व सदस्य राष्ट्रवादीचे असले तरीही शिवसेनेचे उमेदवार बाबर यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.कवठेमहांकाळ तालुक्यातील अजितराव घोरपडे यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यांना तासगाव-कवठेमहांकाळमधून भाजपकडून उमेदवारी मिळणार आहे. जिल्हा परिषद सदस्य तानाजी यमगर आणि राजेंद्र माळी हे दोघे त्यांचे कट्टर समर्थक आहेत. या दोघांनीही पक्षापेक्षा आमचे नेत्यांवर प्रेम असून, नेते जातील तेथे आपण जाणार असल्याचे जाहीर केले आहे.कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व असणारे राष्ट्रवादीचे चौथे नेते पृथ्वीराज देशमुख यांनीही भिलवडी येथे नितीन गडकरींचे जंगी स्वागत करून प्रवेशाची चुणूक दाखविली आहे. जाहीर प्रवेश केला नसला तरी, शिवसेना-भाजपच्या जागा वाटपाचा गुंता मिटला की, ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. सुवर्णा पिंगळे या एकमेव जिल्हा परिषद सदस्या त्यांच्या समर्थक असून, त्यांनीही देशमुखांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले.राष्ट्रवादीचे एकेकाळचे नेते आणि सध्याचे भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या समर्थक जिल्हा परिषद सदस्या शुभांगी पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतच भाजपचा प्रचार केला होता. सध्याही त्या नेते सांगतील, त्या उमेदवाराचाच प्रचार करणार आहेत.राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले आठ ते नऊ जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीमधील २२ सदस्य विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. यामुळे संबंधित सदस्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची छाप असली तरी, ते शिवसेना-भाजप महायुतीचाच प्रचार करणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.नेत्यांनाच आव्हानकवठेपिरान गटातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झालेले भीमराव माने यांनी नेत्यांवर नाराजी व्यक्त करून शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते स्वत:च वाळवा मतदारसंघातून ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत, तर काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपले एकेकाळचे नेते मदन पाटील यांना आव्हान दिले आहे.जत, खानापूरमध्ये राष्ट्रवादीला धक्काजत पंचायत समितीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि पालकमंत्री पतंगराव कदम यांनी प्रयत्न केले होते. परंतु, राजकीय घडामोडीत विलासराव जगताप यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून समर्थक सदस्यांची मोट बांधली. जत पंचायत समिती सभापतीपदी लक्ष्मी मासाळ व उपसभापतीपदी बिरदादा जहागीरदार यांची वर्णी लावून त्यांनी गड शाबूत ठेवला आहे. माजी आमदार अनिल बाबर यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे खानापूर पंचायत समिती सभापतीपद बाबर समर्थक की राष्ट्रवादीकडे जाणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. येथेही राष्ट्रवादीच्या सदस्यांनी बाबर यांच्याबरोबर जाणे पसंत केल्यामुळे खानापूर पंचायत समितीवर बाबर गटाचे वर्चस्व कायम राहिले आहे. दोन्ही पंचायत समित्या तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असून, येथे शिवसेना आणि भाजपचीच सत्ता आहे. या दोन्ही पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादीला राजकीयदृष्ट्या जबर धक्का बसला आहे.
छाप आघाडीचा, प्रचार महायुतीचा
By admin | Updated: September 15, 2014 23:13 IST