सांगली : सर्वव्यापी बनलेल्या मोबाईलने आता मुलांचे बालपणही कब्जात घेतले आहे. आजवर मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या पालकांना लॉकडाऊनच्या काळात स्वत:हून मुलांच्या हाती मोबाईल देणे भाग पाडले. मोबाईलने घरकोंबडी झालेली मुले मैदानी खेळांपासून दुरावत असल्याचे अत्यंत चिंताजनक चित्र घरोघरी दिसू लागले आहे.
विविध शाळांतील पालक मेळावे, शिबिरे यातील चर्चेमध्ये मुले आणि मोबाईल ही सार्वत्रिक चिंतेची बाब बनल्याचे पुढे येत आहे. सांगली-मिरजेसारख्या ग्रामीण शहरांतील सर्वच शाळांनी विद्यार्थ्यांना शंभर टक्के मोबाईल बंदी केली होती, त्यांनाही लॉकडाऊन काळात बंदी उठवावी लागली. सांगलीत गर्दीने नेहमी गजबजणाऱ्या शिवाजी क्रीडांगणावर सध्या फक्त रविवारीच मुले दिसतात, तीदेखील एखाद्या शिबिराच्या निमित्तानेच. एरवी मोबाईलच्या स्क्रीनवर तासनतास डोळे रोखून बसलेली मुले घरोघरी दिसू लागली आहेत. लहानग्या वयातच डोळ्यांचे डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञांचे रुग्ण ठरत आहेत. आमची मुले मोबाईलमध्ये आमच्यापेक्षा पुढे आहेत हे कौतुकाने सांगणारे पालक आता शिक्षकांना मोबाईलचे व्यसन सोडविण्यासाठी उपाय विचारताना दिसतात. क्रीडांगणावर खो-खो खेळण्याऐवजी मोबाईलवर तासनतास फायरिंगचा गेम खेळणारी मुले चिडचिडी आणि हिंसक बनत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. मोबाईल खरेदी करतानाही पालकांपेक्षा मुलांनी ठरविलेल्या ब्रँडला अधिक पसंती मिळत आहे. कोणत्या मोबाईलमध्ये चांगली ॲप्स आहेत, गेमसाठी कोणत्या मोबाईलची बॅटरी अधिक चांगली याची गणिते मुलांनाच अधिक कळत आहेत. कर लो दुनिया मुठ्ठी मे म्हणताना मोबाईलने मुलांनाच मुठीत गच्च पकडले आहे.
चौकट
शाळेतून घरी परतताच मोबाईलमध्ये गुरफटलेली मुले मध्यरात्र झाली तरी त्यातच डोळे लावून बसतात. हातात मोबाईल असल्याशिवाय जेवायलाच बसत नाहीत असे एका महिलेने सांगितले. कार्टून बघत, गाणी बघत किंवा गेम खेळत जेवणाची सवय अति घातक आहे. २४ तास मोबाईलच्या सवयीला पालकांनीही आवर न घातल्याने नैसर्गिक बालपण हरवत चालले आहे. निद्रानाशासह अनेक आजारांचा विळखा मोबाईल घालू लागला आहे. काही पालक व उच्चभ्रू शाळा मुलांच्या हाती तथाकथित गरजेच्या नावाखाली मोबाईल देतात, नंतर तो काढून घेणे अजिबात शक्य होत नाही.
चौकट
विटीदांडू गायब
शहरी भागात मुलांचे मैदानी खेळ संपुष्टात येत आहेत. पारंपरिक खेळ कधीच हरवलेत, शिवाय क्रिकेट, फूटबॉल सारख्या सांघिक खेळात सुद्धा मोजकीच मुले मैदानावर दिसत आहेत. तुलनेने ग्रामीण भागात स्थिती नियंत्रणात आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने घरोघरी स्मार्टफोन नसणे किंवा संपूर्ण कुटुंबात एखादाच स्मार्टफोन असणे ही बाब मुलांना सक्तीने मैदानावर पाठविणारी ठरली आहे. मोडक्या तोडक्या सायकलीशी झोंबाझोंबी करणारी, टायरचे चाक करुन घामाघूम होईपर्यंत धावणारी, भर उन्हात गलोरी खेळणारी मुले मोबाईलने गायबच केली आहेत.
चैाकट
कोरोनाने दिला मोबाईलचा रोग
कोरोनाने अवघ्या जगाला कवटाळले आणि त्याचवेळी घराघरातील मुले मोबाईलच्या पाशात अडकली. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ऑनलाईन शिक्षणही सुरु नव्हते. महिनो न महिने घरात बसलेले पालक टीव्हीत गुंतले तर मुलांनी मोबाईल जवळ केला. या काळात मोबाईल गेम डाऊनलोड करणे आणि ऑनलाईन गेमिंग करणे याचे प्रमाण सरासरीपेक्षा दहा ते वीस पटींनी वाढल्याचे निरीक्षण आहे.
८० टक्के इनडोअर गेम्स, २० टक्के आऊटडोअर गेम्स
कोट
मोबाईल म्हणजे मुलांचा दुसरा पालकच ठरला आहे. मोबाईल दिला नाही तर मुले हिंसक बनत असल्याचा अनुभव अनेक पालक सांगताना दिसतात. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांसाठी मोबाईल अत्यावश्यक बनला, पण त्याचे दुष्परिणामही तितक्याच गंभीरपणे जाणवत आहेत.
- अर्चना मुळे, समुपदेशक.
कोट
मुलासाठी स्वतंत्र स्मार्टफोन घ्यावा लागला. शाळेत जाताना मोबाईल देत नाही, पण परतल्यानंतर झोपेपर्यंत मोबाईल शिवाय त्याला चालत नाही. मोबाईल दिला नाही तर चिडचिडा बनतो. गेल्या अनेक दिवसांत क्रिकेटशिवाय अन्य खेळ त्याने खेळलेले नाहीत.
- विलास गावडे, ग्रामीण पालक