सांगली : सांगलीच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून अंकलीपर्यंतचा ५.८० किलोमीटरचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ मध्ये समाविष्ट केल्यानंतरही निधीच्या गोंधळात फसला आहे. कधी राष्ट्रीय महामार्गातून हे काम होणार असल्याचे सांगण्यात आले तर कधी बीओटीतून हा रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सामान्य वाहनधारक या रस्ते कामाच्या प्रतीक्षेतच आहेत.
सांगली ते अंकली हा रस्ता रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचा भाग आहे. यापूर्वी सांगली ते शिरोली या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दिले होते. १९६ कोटी रुपयांच्या या कामातील जवळपास ६५ टक्के काम पूर्ण केल्यानंतर हा मार्ग राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट झाला. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, अद्याप या कामाचे घोंगडे भिजत पडले आहे. सांगली ते अंकली या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा विषय प्रलंबित आहे. राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी पुन्हा बीओटीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने गोंधळ उडाला आहे.
या ना त्या कारणामुळे या रस्त्याचे अपुरेपण संपलेले नाही. सांगली ते अंकली या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे सामाजिक संघटनांनी यावर आवाज उठविला होता. त्यासाठी पाठपुरावाही केला. काहीअंशी या कामात यश मिळाले असले तरी चौपदरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण आहे. बसस्थानक परिसरापासून आकाशवाणीपर्यंत रस्ता अरूंद आहे. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. निधी व कामाचा गोंधळ संपणार तरी कधी, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.