फोटो- चांदोली परिसरात शिवारातील भाताचे वाफे तुडुंब भरले आहेत. रोपलागण करण्यासाठी उभ्या पावसात शेतकरी नांगरट करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी अधून-मधून जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक वाढतच आहे. धरणातून एक हजार ६०५ क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरूच आहे. चांदोली धरण परिसरात १६ जूनपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरात पाणीच पाणी झाले आहे. ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. डोंगरकपारीतील धबधबे कोसळत आहेत. हिरवागार निसर्ग पर्यटकांना आकर्षित करीत आहे.
गेल्या २४ तासांत ५२ मिलिमीटरसह एकूण ४१४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून १३ हजार १८५ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा १६.९० टीएमसी असून, त्याची टक्केवारी ४९.१३ अशी आहे. पाणीपातळी ६०६ मीटर झाली आहे. ती १६ जूनला ६०१.३० मीटर होती. चार दिवसांत पावणेपाच मीटरने पाणीपातळी वाढली आहे.