सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीत जतच्या जागेसाठी कॉँग्रेसचे आ. पतंगराव कदम आणि राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील आमने-सामने आले आहेत. विलासराव जगताप यांचे पुत्र मनोज जगताप यांना धक्का देऊन विक्रम सावंत यांना या ठिकाणी निवडून आणण्यासाठी पतंगरावांनी जनसुराज्य पक्षाच्या मतदारांना गळ घातला आहे. दुसरीकडे थोडक्यात दगाफटका होऊ नये म्हणून जयंतरावांनीही जनसुराज्यच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या जागेसाठी दोन्ही नेत्यांनी राजकीय ताकद पणाला लावली आहे. जत तालुक्यातील सोसायटी गटात जोरदार चुरस निर्माण झाली आहे. याठिकाणी कॉँग्रेसचे विक्रम सावंत आणि भाजपचे मनोज जगताप यांच्यात लढत होत आहे. भाजपचे आ. विलासराव जगताप यांनी निवडणुकीत पतंगराव कदम व मोहनराव कदम यांना टार्गेट केले होते. त्यामुळे कदम गटाने जगताप यांना धक्का देण्यासाठी या ठिकाणी ताकद पणाला लावली आहे. शनिवारी रात्री पतंगराव कदम यांनी जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांची भेट घेतली. मिरजेतील पक्षाचे युवा संघटना प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत दोन्ही नेत्यांची बैठक झाली. या बैठकीतील निर्णय गुलदस्त्यात असला तरी, कोरे यांनी भाजपच्या नेत्यांना धक्का देण्याचा इशारा दिला आहे. पतंगराव आणि विनय कोरे यांच्यातील बैठकीची माहिती मिळताच जयंत पाटील यांनी विनय कोरे यांच्याशी संपर्क साधला. रविवारी रात्री समित कदम, बसवराज पाटील व अन्य कार्यकर्त्यांशीही त्यांची चर्चा झाली. जतमध्ये थोडक्यात दगाफटका होऊ नये म्हणून खासदार संजय पाटील, जयंत पाटील आणि विलासराव जगताप यांनी सतर्कता बाळगली आहे. रात्री उशिरापर्यंत जतमधील राजकीय हालचालींवर दोन्ही पॅनेलचे नेते लक्ष ठेवून होते. विनय कोरे यांनी याबाबतचा निर्णय अद्याप जाहीर केला नाही. जतमध्ये एकूण ८८ मतदान आहे. यामध्ये भाजपचे बहुमत असले तरी कॉँग्रेसची मतेही त्यांच्या जवळपास आहेत. त्यामुळे जनसुराज्यच्या मदतीने भाजपला धक्का देण्यासाठी कॉँग्रेस नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. (प्रतिनिधी)
जतच्या जागेसाठी दिग्गजांच्या खेळ््या
By admin | Updated: May 4, 2015 00:35 IST