घाटनांद्रे : कवठेमहंकाळ तालुक्यात द्राक्ष हंगाम सध्या जोरात सुरू असून तो अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे द्राक्ष दरात किंचितशी वाढ दिसून येत आहे.
कवठेमहंकाळ तालुक्यातील पोषक वातावरण, म्हैशाळ व टेंभू योजनांचे पाणी आल्याने द्राक्षक्षेत्रही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे हे पीक तालुक्यातील बळिराजाचा आर्थिक कणाही बनले आहे.
तालुक्याच्या जवळजवळ सर्वच भागांत द्राक्षशेती केली जाते. सध्या वातावरणातील थंडीने निरोप घेतला असून, तिची जागा तीव्र उन्हाने घेतली आहे. वातावरणातील या तापमानवाढीने द्राक्षालाही मागणी वाढली आहे. त्यामुळे आपसुकच दरातही किंचितशी वाढ झालेली दिसून येत आहे.
पेटीस पंधरा-वीस रुपयांची वाढ झालेली दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात देशांतर्गत बाजारात मागणी वाढल्याने अनेक परप्रांतीय व्यापारी द्राक्षे खरेदीसाठी तालुक्यात फिरत आहेत. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण झाले आहे. मुंबई, बंगलोर, कोलकाता, चेन्नई, बांगलादेश, दिल्ली, आदी भागांतून दलाल द्राक्षे खरेदीसाठी आले आहेत.
घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापूर, जाखापूर व कुची परिसरांत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून द्राक्ष दलाल इकडे द्राक्ष खरेदीसाठी येत आहेत. मागील पूर्वानुभव लक्षात घेता बळिराजा रोखीने व्यवहार करताना दिसत आहे. तसेच काही शेतकऱ्यांना द्राक्षास म्हणावा तसा दर मिळत नसल्याने त्यांनी बेदाणा निर्मितीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चालू वर्षी बेदाणा निर्मितीही मोठएा प्रमाणात होणार आहे.
चाैकट
द्राक्षांचे दर
बाजारपेठेत सध्या (प्रती चार किलोस) सुपर सोनाक्का १५० ते २१० रुपये, माणिक चमन १२० ते १५० रुपये, एस. एस. १६० ते २२०, शरद सीडलेस १५० ते २२० रुपये असा दर सुरू आहे.