विटा : मराठी बांधवांनी देशाच्या विविध राज्यांत सुरू केलेल्या सोने-चांदी गलाई व्यवसायाला भारत सरकारने कायदेशीर मान्यता देऊन या उद्योगाचा राजपत्रात समावेश करावा, ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी अखिल भारतीय सोने-चांदी गलाई संघटनेचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. दि.२ फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता मंत्री गडकरी यांनी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी उद्योजक शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.
सांगली, सातारा, सोलापूर यांसह विविध जिल्ह्यांतील अनेक लोक सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यांत विखुरले आहेत. सुमारे तीन लाख कुटुंबे हा व्यवसाय करीत आहेत. परंतु, हा व्यवसाय आज अनेक समस्येतून मार्गक्रमण करीत आहे. या व्यवसायाला कायदेशीर मान्यता मिळावी व त्याचा उद्योग व्यवसायाच्या राजपत्रात समावेश केल्यास व्यवसाय वाढीसाठी चांगले वातावरण निर्माण होऊन त्याला प्रतिष्ठा मिळणार आहे. सोने-चांदी गलाई उद्योजकांनी ही मागणी केल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे ही मागणी तत्काळ मान्य करावी, यासाठी काशी मराठा समाजाचे अध्यक्ष व मराठी समाजाचे वरिष्ठ महामंत्री संतोष पाटील यांनी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना पत्र दिले होते. त्यानंतर माजी राज्यपाल नाईक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लेखी पत्र देऊन याबाबत निर्णय घ्यावा, असे सूचित केले होते.
त्यानुसार केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सोने-चांदी गलाई उद्योजकांच्या शिष्टमंडळाला दि. २ फेब्रुवारीला दिल्ली येथील निवासस्थानी चर्चेसाठी बोलविले आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी मराठी समाज उत्तर प्रदेशचे संस्थापक अध्यक्ष उमेशकुमार पाटील, काशी मराठा समाजाचे अध्यक्ष संतोष पाटील, अखिल भारतीय सोने-चांदी रिफायनरी संघटनेचे गोल्ड कौन्सिल समन्वयक उदय शिंदे यांच्यासह शिष्टमंडळ चर्चेसाठी उपस्थित राहणार आहे. ही चर्चा नक्कीच सकारात्मक होऊन परप्रांतातील उद्योजकांना नक्कीच न्याय मिळेल, अशी अपेक्षा संघटनेचे वरिष्ठ महामंत्री संतोष पाटील यांनी व्यक्त केली.