जत तालुक्यातील ४६ पाणीपुरवठा योजनांची कामे २००८ पासून अपूर्ण आहेत. कोट्यवधीचा निधी खर्च करूनही योजना अपूर्ण असल्याबद्दल डुडी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. दोन महिन्यांपूर्वी जत येथे त्यांनी आढावा बैठक घेतली होती. यावेळी कामे पूर्ण करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. बुधवारी डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जी. सोनावणे, उपकार्यकारी अभियंता यु. ए. देशपांडे यांनी गावनिहाय आढावा घेतला. कंठी, प्रतापूरच्या दोन, करेवाडी-कोंत्यावबोबलाद, निगडी खुर्द अशा पाच योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. वारंवार सूचना देऊनही बिरनाळ येथील २० टक्के काम अपूर्ण आहे. वळसंग, खिलारवाडी येथील टाकीचे काम अपूर्ण आहे. या तीन गावांतील ठेकेदार, पाणीपुरवठा समिती अध्यक्ष, सचिवांच्या मालमत्तेवर टाच आणून अपूर्ण कामांचे पैसे वसूल करण्यात येतील, असा इशारा डुडी यांनी दिला.
उर्वरित ३८ गावांमधील योजनांची कामे अत्यंत किरकोळ राहिली आहेत. ती कामे पूर्ण करण्यासाठी दि. ३१ मार्चची डेडलाईन दिली आहे. त्यानंतर कामे अपूर्ण राहिल्यास दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.