मिरज : मिरजेतील समतानगर आणि माणिकनगर परिसरात घरफोड्या करणाऱ्या मनोज दत्तू जोगदंड (वय ३५, रा. बन्सारोळा, जि. बीड) व विनोद शिवाजी हणमंते (३२, उदगीर) या दोघा गुन्हेगारांना पोलिसांनी बीडमध्ये अटक केली. मनोज जोगदंड याने साथीदारांच्या मदतीने मिरजेत पाच ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. चोरट्यांनी मे महिन्यात समतानगर, माणिकनगर परिसरात पाच ठिकाणी घरफोड्या करून पोलीस यंत्रणेला आव्हान दिले होते. येथील इलाहीबक्ष मुल्ला, रब्बानी खतीब, जाफर गुरेखान, इजाज सय्यद, पीरामा जातगार या पाचजणांची बंद घरे फोडून पावणेचार लाखां चा ऐवज चोरून नेण्यात आला. चोरट्यांनी एका घरातून चोरलेल्या मोबाईलवरून पोलिसांना त्यांच्या ठावठिकाणा समजला. मनोज जोगदंड, विनोद हणमंते व त्यांच्या अल्पवयीन साथीदाराने मिरजेत येऊन घरफोड्यांचा सपाटा लावला होता. पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे व उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांच्या पथकाने जोगदंड व विनोद हणमंते या दोघांना बीड येथून अटक केली असून, त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात येणार आहे. मनोज जोगदंड याने चोरलेले दागिने लातूर येथील सराफाला विक्री केल्याची कबुली दिली आहे. रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकाजवळच्या परिसरात घरफोड्या करून रेल्वेने पळून जाण्याची त्यांची पध्दत होती. या चोरट्यांनी मिरजेतील घरफोड्यांसह पुण्यातील सिंहगड रस्ता, लष्करी छावणीच्या आवारातून चंदनाची झाडे चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. जोगदंड अट्टल गुन्हेगार असून, त्याने गेल्या पाच वर्षात अनेक घरफोड्या केल्या आहेत. दोघांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी दिली आहे. चोरलेला ऐवज हस्तगत करण्यासाठी पोलीस पथक बीड येथे जाणार आहे. (वार्ताहर)