कवठेमहांकाळ : केंद्र शासनाच्या शेतीविरोधी धोरणामुळे आज देशातील शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आता भाजप सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. भविष्यात सहकारी खरेदी-विक्री संघ आणि बाजार समित्या मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
कवठेमहांकाळ येथे साेमवारी शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे, संस्थेचे अध्यक्ष सुरगौड पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयंत पाटील म्हणाले की शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळली पाहिजे. यासाठी यापुढील काळात राज्य सरकार प्रयत्नशील राहील. शेतकरी संघाचे अध्यक्ष सुरगौड पाटील यांनी अडचणीच्या काळात शेतकरी संघाचे अस्तित्व टिकवले आहे. हे त्यांचे मोठे काम आहे. आपण त्यांना शेतकरी संघ बळकट करण्यासाठी पूर्ण ताकद देऊ.
यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले. आजवरच्या राजकीय कारकिर्दीत शेतकऱ्यांना व त्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा यासाठी लढलो. भविष्यात ही हा लढा सुरूच राहील.
राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे म्हणाल्या. शेतकरी सहकारी संघ हे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासाचे केंद्र आहे. हे केंद्र टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी जयंत पाटील यांनी सहकार्य करावे.
शेतकरी संघाचे अध्यक्ष सुरगौड पाटील यांनी स्वागत केले. यावेळी उपाध्यक्ष संभाजी पवार, सचिव मनोज पाटील, गणपती सगरे, दत्ताजीराव पाटील, युवा नेते शंतनू सगरे, नगराध्यक्ष पंडित दळवी, गजानन कोठावळे, मोहन खोत, अय्याज मुल्ला, पांडुरंग पाटील, टी. व्ही. पाटील, बाळासाहेब पाटील, अमित शिंत्रे, सौरव पाटील, प्रवीण कुनुरे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : २५ केएम १
अेाळ : कवठेमहांकाळ येथील शेतकरी सहकारी संघाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी अजितराव घोरपडे, अनिता सगरे, सुरगौड पाटील उपस्थित हाेते.