लोकमत न्यूज नेटवर्क
जत : पीक विम्याची नुकसानभरपाई मिळाली नाही म्हणून जत तालुका कृषी विभाग व पीक विमा कंपनीच्या विरोधात निषेध व्यक्त करून तालुक्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
तालुक्यातील शेगाव, उमदी व डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील शेतकऱ्यांना तालुका कृषी विभागातील आधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पीक विमा योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. जत तालुका कृषी विभागाच्या मनमानी व अनागोंदी कारभारामुळे आणि चुकीच्या प्रजन्य मापक यंत्रामुळे प्रत्यक्षात नुकसान झाले असतानाही शेतकऱ्यांच्या पिकाचे सर्वेक्षण होऊन पंचनामा करण्यात आलेला नाही. वरील तीन जिल्हा परिषद मतदारसंघातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असताना त्यांना शासनाकडून काहींच नुकसानभरपाई मिळालेली नाही. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मच्याऱ्यांनी कागदी घोडे नाचवून आपली जबाबदारी झटकली आहे.
यासंदर्भात संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. या लाक्षणिक उपोषणात ॲड. प्रभाकर जाधव, सोमनिंग बोरामणी, तानाजी शिंदे, रमेश माळी, अँड. सुरेश घागरे, शरणू आक्की, एन. डी. शिंदे, शिवाजी शिंदे, संजय कांबळे, विक्रम ढोणे, आदी सहभागी झाले होते.