लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दुचाकीच्या सायलंसरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्यांमुळे इतर वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता यात भर पडत पोलिसांसारख्या रंगाच्या व बंद चालू होणाऱ्या इंडिकेटरमुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळेत भरधाव वेगाने धोकादायक इंडिकेटर्स लावून जाणाऱ्या वाहनधारकांवर आता कारवाईची मागणी होत आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांमध्ये कोणताही बदल करावयाचा नसतो. तरीही गेल्या काही महिन्यांपासून सायलंसर बदलून वेगळ्याच आवाजात वाहन पळविणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अगदी याच्या स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. अखेर पोलिसांनी एकाचवेळी ४०हून अधिक वाहनांवर कारवाई केल्यानंतर शहरात काही कालावधीसाठी हे प्रमाण कमी आले आहे. तरीही बुलेटच्या सायलंसरमध्ये बदल करण्याचे प्रकार सर्रास सुरूच आहेत.
वाहनाला पुढे दोन व मागे दोन असलेले इंडिकेटर्स हे वाहतूक सुरक्षेच्यादृ्ष्टीने खूप महत्त्वाचे असतात. वळण घेताना त्याचा वापर केल्याने अपघातांच्या घटना थांबत असतात. मात्र, आता इंडिकेटर्समध्येही बदल करण्याचे नवीनच फॅड वाहनधारकात आले आहे. इंडिकेटर्सचा उपयोग केवळ उजवीकडे, डावीकडे दिशा दाखविण्यासाठी अपेक्षित असताना, अनेक वाहनधारक चारही इंडिकेटर्स एकाचवेळी लागतील असा बदल करून घेत आहेत. त्यामुळे लांबून वाहन बघताना पोलीस गाडीचाच भास होतो. शिवाय अनेकांनी त्याचे रंगही हुबेहूब पोलिसांच्या दिव्यांप्रमाणे करून घेतले आहेत. त्यामुळे अनेकांचा गैरसमज होतो. याशिवाय या दिव्यांचा प्रकाश प्रखर असल्याने पाठीमागून जाणाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
चौकट
चायनामेड, मिरची इंडिकेटस त्रासदायक
दुचाकीचे इंडिकेटर बदलताना अनेकजण चायनामेडचा वापर करत आहेत. शिवाय मिरची इंडिकेटरमुळे आकार लहान असलातरी त्याच्या प्रकाशामुळे इतरांचे डोळे दिपून जात आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील वर्दळ कायम असतानाच, या वाहनधारकांची धोकादायक रपेट अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे.
कोट
सायलंसरपाठोपाठ इंडिकेटर्समध्ये बदल करण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यात वाहनचालकांसह असे बदल करणाऱ्या मॅकेनिकवरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कुणीही असे बदल करून नयेत.
प्रज्ञा देशमुख, सहा.पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा