शिराळा : तालुक्यातील हात्तेगाव, खुजगाव, खिरवडे गावाच्या शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यामधील सर्व अडचणी सोडवू, अशी ग्वाही तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.
येथील तहसीलदार कार्यालयात हात्तेगाव, खुजगाव, खिरवडे गावातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली.
यावेळी तहसीलदार शिंदे यांच्याकडे या तिन्ही गावामधील शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावरील नोंदीची दुरुस्ती करणे, १५५ च्या खाली ऑनलाईन सात-बारा अद्ययावत करणे, वारस नोंदीमधील अडचणी दूर करून मार्गी लावणे, यासाठी गावनिहाय कॅम्प घेण्यात यावेत, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
सत्यजित देशमुख म्हणाले की, या तिन्ही गावातील शेतकऱ्यांच्या अनेक दिवसांपासून या मागण्या प्रलंबित राहिल्या आहेत. वारंवार हे प्रश्न घेऊन लोक या ठिकाणी येत असतात. परंतु कामे मार्गी लागत नसल्याने लोक निराश होऊन माघारी जात. तहसीलदारांनी यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले की, तिन्ही गावातील शेतकरी व ग्रामस्थ यांच्या मागण्या योग्य असून येत्या काळामध्ये सर्व मागण्या पूर्णत्वास आणणार आहे.
यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, बाजीराव शेंडगे, नथुराम सावंत, श्यामराव सावंत, प्रकाश सावंत, धनाजी सावंत, बाळू सावंत, भीमराव सावंत, विक्रम सावंत, प्रकाश सावंत, हरी सावंत, सुरेश पवार उपस्थित होते.