अभियंता बनणे काही सोपे काम नाहीये, किमान ४ वर्षे, ८ सेमिस्टर, ४० विषय, ४०० प्रॅक्टिकल्स, ४००० असाइनमेंट, ४०,००० तास त्यासाठी द्यावे लागतात. हे करणे ज्याला जमले तो व्यक्ती म्हणजे अभियंता. अभियंता म्हणजे तो ज्याला जग बदलायचे आहे. अभियंता म्हणजे तो ज्याला नवीन वस्तू बनवायला आवडतात. अभियंता म्हणजे तो ज्याला दुसऱ्याचं जीवन सहज करायला आवडते. अभियंता म्हणजे तो ज्याला निरनिराळे शोध लावायला आवडतात. अभियंता म्हणजे तो ज्याला अशक्य म्हणजे काय ते माहीत नसते. अभियंता म्हणजे तो जो एक गोष्ट करायचे वेगवेगळे मार्ग शोधून काढतो.
आज १५ सप्टेंबर राेजी अभियंता दिन साजरा केला जातो. कारण आज भारताचे पहिले अभियंता भारतरत्न सर एम. व्ही. विश्वेश्वरय्या यांची जयंती असते. त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. सर विश्वेश्वरय्या हे भारतामधील सर्वांत मोठ्या धारणांपैकी एक असलेल्या कृष्ण सागर धरणाचे आर्किटेक्ट होते. तसेच ते सिंचन आणि पूर व्यवस्थापन तज्ज्ञ होते. त्यासोबतच ते म्हैसूर संस्थानचे दिवाण होते.
आज भारतात दर वर्षी १५ लाखांहून अधिक अभियंता तयार हाेतात. अमेरिका आणि चीन या देशातील अभियंत्यांच्या संख्येची तुलना केली तर त्याहूनही भारताची आकडेवारी अधिक आहे. सिलिकॉन व्हॅली मधील १६ टक्के स्टार्टअपचे मालक भारतीय अभियंते आहेत. पण इंजिनिअरिंगची एक बाजू पूर्णपणे काळोखात ठेवली जाते ती म्हणजे बेरोजगारी. एआ आकडेवारीनुसार ७५ टक्के अभियंते हे बेरोजगार आहेत. याला कामाची कमतरता, कौशल्याचा अभाव, अयोग्य शिक्षण व्यवस्था अशी बरीच कारणे आहेत.
आपल्या इथे गलेलठ्ठ पॅकेजच्या आमिषाने मुलांना जबरदस्तीने इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यावे लावतात. परिणामी, ईच्छा नसताना अनेकांना अभियंता बनावे लागते. एवढे करून पण नंतर नाेकरी मिळत नाही. त्यामुळे दुसऱ्या क्षेत्रात राेजगार शाेधावा लागतो यामुळेच आज बऱ्याच क्षेत्रामध्ये अभियंते काम करताना दिसतात.
पण ज्यांनी कोणीपण इंजिनिअरिंग केली असेल ना त्यांना एक गोष्ट तर नक्की जाणवली असेल की इंजिनिअरिंगमध्ये आपण काही शिकलो असेल किंवा नसेल पण इंजिनिअरिंगने आपल्याला आयुष्यं जगायला शिकवलं हे नक्की. आणि अभियंता म्हणून आम्ही आयुष्यात काहीही करू शकतो हा स्वाभिमान व आत्मविश्वास या ४ वर्षांमध्ये येतो. तो कुठेच भेटत नाही. सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.