शिराळा : वंचित घटकातील, गोरगरीब, विमुक्त जाती-जमाती, अनुसूचित जाती-जमाती, ऊसतोड कामगार यांच्यासह स्थलांतरित कामगारांच्या ८० हजार मुलांना कोरोनानंतर पुन्हा शिक्षण प्रवाहात आणणार आहे. स्वराज्य शिक्षक संघाच्यावतीने खा. शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविणार असल्याचे स्वराज्य शिक्षक संघाचे प्रदेश अध्यक्ष फत्तेसिंह पवार यांनी सांगितले.
ते म्हणाले, १२ डिसेंबर ते १२ फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये ६ ते १८ वयोगटातील ८० हजार विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. राज्यातील सर्व शिक्षक संघटना, आश्रमशाळा संघटना, आश्रमशाळा संस्थाचालक संघटना, विविध सामाजिक संघटना यांच्याबरोबर चर्चा सुरू असून, सर्वांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यातील ‘विमुक्त जाती, भटक्या जमाती आश्रमशाळांमधील जवळपास १४ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व जिल्हा, तालुका, गावे, वाड्या-वस्त्या या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन, चर्चा करून, पालक शिक्षक बैठक घेऊन हा उपक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
ते म्हणाले, लॉकडाऊन काळातसुध्दा स्थलांतरित, वंचित घटकातील विद्यार्थी, वीटभट्टी कामगार, ऊसतोडणी कामगार, खाणकाम कामगार यांच्या मुलांपर्यंत जास्तीत-जास्त शिक्षण पोहोचविण्यासाठी आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. वही, पेन, पुस्तकासह शैक्षणिक साहित्य वाटप केले जाणार आहे. आता हा वंचित घटकातील विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येण्यासाठी आश्रमशाळा कर्मचारी प्रयत्न करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.