खानापूर : अग्रणी नदी पुनरुज्जीवनासाठी सर्वांच्या सहकार्याबरोबरच राजकारणविरहीत सहभागाची गरज आहे. शासनाबरोबर प्रत्येक माणसाने ठरवले तर अग्रणी नदी बारमाही होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी केले. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत अग्रणी पुनरुज्जीवनच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सौ. अंजली मरोड, उपसभापती सुहास बाबर, जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, बलवडी (खा.) येथील एका बंधाऱ्याची प्रेरणा घेऊन राज्यात २४००० बंधारे उभा करण्याचे शासनाने प्रयत्न चालू आहेत. त्यापैकी ५००० बंधाऱ्यांचे काम सुरू आहे. आमदार अनिल बाबर यांनी अग्रणी नदी पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे सुरक्षित हातात काम दिल्यामुळे हे काम प्रभावीपणे होणार आहे. तसेच पक्षविरहीत सहभागातून जनतेचे कल्याण होणार आहे. बिनपैशाचीसुध्दा मोठी कामे होऊ शकतात, हे या भागातील लोकांनी दाखवून दिले आहे. यापुढेसुध्दा लोकांच्या बरोबरीने जलबिरादरीचासुध्दा सहभाग राहील, अशी ग्वाही राजेंद्रसिंह राणा यांनी दिली. आमदार अनिल बाबर म्हणाले, आम्ही सर्वांना सोबत घेऊन ही अग्रणी नदी पुनरुज्जीवित करणार आहोत. जिथे गरज असेल, तेथे बंधारे उभे करण्यास मदत करू. या प्रकल्पात राजकीय पक्ष व राजकारण बाजूला ठेवून एकत्रपणे काम करू. लोकांच्या सहकार्याबरोबरच प्रशासनाचा पुढाकार असल्यामुळे या प्रकल्पात कोणतीही अडचण येणार नाही. बाहेरून पाणी, आणून अग्रणी बारमाही होईलच, परंतु लोकसहभागातून पाणी उभा राहिल्यास ती शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद महत्त्वाचा ठरेल. पंचायत समिती, खरेदी-विक्री संघ, मार्केट कमिटी हे सुध्दा अग्रणी नदी पुनरुज्जीवनासाठी मदत करणार आहेत. कृषी विभाग व पंचायत समितीने या कामाच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न करावेत. कोणतेही काम हे उत्कृष्टच झाले पाहिजे, याबाबत दक्षता घ्यावी, असे आमदार बाबर म्हणाले. पुढे जाऊन प्रशासन कामे करणार आहे. लोकसहभाग आणि शासन यांची सांगड घालून ही कामे करण्यात येणार आहेत. यासाठी विशेष मदत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व प्रांताधिकारी सचिन इथापे यांची मिळत आहे. तसेच जलबिरादरीचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी जमदाडे, जि. प. कार्यकारी अभियंता एल. डी. हवेलीकर, तालुका कृषी अधिकारी डुबल, बेणापूर सोसायटीचे अध्यक्ष गणपतराव भोसले, जि. प. सदस्य फिरोज शेख, जलबिरादरीचे डॉ. सुनील जोशी, डॉ. रवींद्र व्होरा, विनोद बोधनकर, संपतराव पवार, नरेंद्र न्युग, देवयानी कुलकर्णी, उपअभियंता डी. डी. कांबळे, पोसेवाडी, बलवडी, ऐनवाडी, गोरेवाडीचे सरपंच राजेंद्र शिंदे, कृष्णदेव शिंदे, बाळासाहेब जाधव, परशराम गायकवाड, सुभाष आप्पा गायकवाड, तसेच तलाठी, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेंद्रसिंह राणा यांनी तामखडी, अडसरवाडी येथील जालिंदरनाथ करी, बलवडी, आपटेमळा, विठ्ठलनगर, बेणापूर, सुलतानगादे, करंजे येथे सुरू असलेल्या अग्रणी नदी पुनरुज्जीवनच्या कामांना भेटी दिल्या. (वार्ताहर) भविष्यात फायदा अग्रणी नदी बारमाही करण्यासाठी जे बंधारे बांधण्यात आले, ते महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात मॉडेल म्हणून पुढे आले आहे. लोकसहभागाबरोबरच राजकारणविरहीत चळवळ उभारण्यात आल्याचा मोठा फायदा झाला आहे. अग्रणी पुनरुज्जीवन हे भल्याचे काम आहे. हे काम बचत खात्यासारखे असून, भविष्यात याचा नक्कीच फायदा होणार आहे.
अग्रणी पुनरुज्जीवनात राजकारण नका
By admin | Updated: June 15, 2015 00:19 IST