सांगली : जिल्ह्यातील गरजू कुटूंबांना नवीन शिधापत्रिका देणे, खराब शिधापत्रिका बदलून देणे व इतर तांत्रिक कारणासाठी जिल्हाभरात मोहीम राबविण्यात आली होती. या विशेष मोहिमेचा चांगला फायदा झाला असून जिल्ह्यातील ४९ हजार ९१४ जणांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. कोरोनानंतर नियमित शाळा सुरु झाल्यानंतर शिधापत्रिका आणि शाळेत दाखले देण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
पालकमंत्री पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने राज्यभर शिधापत्रिका व शाळेतच जातीसह विविध दाखले देण्याची मोहीम राबवली होती. फेब्रुवारीमध्ये ही मोहीम झाली. मात्र, त्यानंतर सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुढील कामकाज बंद झाले होते. आता साथ कमी झाल्यानंतर काम पूर्ण करत ५० हजार ५५१ अर्जांपैकी ४९ हजार ९१४ लाभार्थींपर्यंत शिधापत्रिका पोहोच झाल्या आहेत. उर्वरित लाभार्थ्यांच्याही शिधापत्रिकांबाबत निर्णय घेण्याची सूचना दिल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
चौकट
काळ्याबाजारातील तांदूळ कर्नाटकातील
सांगली ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत जिल्ह्यात ८४ टन रेशनिंगचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. याशिवाय जत तालुक्यातही कारवाई केली आहे. याबाबतच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, जिल्ह्यात रेशरिंग धान्याचा काळाबाजार सुरु असताना कारवाई करण्यात आली आहे. मात्र हे रेशनिंगचे धान्य कर्नाटकातून येत आहे. जिल्ह्यातील धान्यामध्ये कोणताही काळाबाजार झालेला नाही. काळ्याबाजारावर कारवाईचे आदेश दिले आहेत.