ते म्हणाले, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे सांगली व सोलापूर जिल्ह्यात साडेसात हजार सभासद आहेत. परंतु कारभाऱ्यांना सभासद हिताचा विसर पडल्यामुळे बहुतांश सभासद कर्जासाठी इतर बँकांकडे वळलेले आहेत, इतर बँकांच्या तुलनेत शिक्षक बँकेमध्ये कर्मचारी भरती वारेमाप झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगार व विविध भत्त्यांवर मोठा खर्च होतो आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी बँकेस भेट देऊन कर्मचाऱ्यांवरील खर्च कमी करावा, अशा सूचना देऊनही त्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा केला जात आहे. बँकेच्या विरोधी बोलणाऱ्या संचालक व सभासदांवर कोर्ट केसेस घातल्या गेल्यामुळे न्यायालयीन खर्चही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
चाैकट
स्वहितासाठी इमारती खरेदी
गेल्या पाच वर्षांमध्ये सत्ताधारी शिक्षक समितीच्या संचालक मंडळाने एकदाही दोन अंकी लाभांश दिला नाही, मात्र कर्जावरील व्याजदर १३ टक्क्यांच्या पुढे नेऊन ठेवला आहे. एकीकडे राष्ट्रीयीकृत बँका भाड्याच्या इमारतीमध्ये आपला कारभार थाटत असतानासुद्धा शिक्षक बँक कारभाऱ्यांनी स्वहित जपण्यासाठी शाखांसाठी इमारती खरेदी करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. हा कारभार असाच सुरू राहिला तर उरलेसुरले सभासद हे इतर बँकांकडे वळतील व शिक्षक बँक होती, असे म्हणण्याची वेळ येण्याची शक्यता आहे, अशी टीका अविनाश गुरव यांनी केली.