मिरज : विवाह व इतर मंगल कार्यास पन्नास ही उपस्थितांची संख्या वाढवून देण्याची मागणी सांगली जिल्हा मंगल कार्यालय आणि केटरिंग असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मंगल कार्यालय व केटरिंग हा हंगामी व्यवसायावर अनेक लोक व जोड व्यवसाय अवलंबून आहेत. विवाहासाठी पन्नास लोक मर्यादा ही कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह आहे. मंगल कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे तीसपर्यंत आहे. केवळ वीस निमंत्रितासह विवाह करणे अवघड असते.
प्रशासनाने हॉल, ऑडिटोरियम हॉटेल, रेस्टॉरंट यांना क्षमतेच्या पन्नास टक्के संख्येने व्यवसायास परवानगी दिली आहे. मात्र मंगल कार्यालयासाठी हा भेदभाव आहे.
कोराेना संख्येने पसरतो की, कार्यक्रमामुळे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेली वर्षभर मंगल कार्यालय आणि केटरिंग व्यवसाय अडचणीत आहे त्यात या निर्बंधामुळे मोठे नुकसान होत आहे. याबाबत प्रशासनाने आठ दिवसात निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी असोसिएशनचे सचिव ओमकार शुक्ल, अभय आठवले, चंद्रकांत देशपांडे, स्नेहल खरे उपस्थित होते.