लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सांगली जिल्ह्यात सुरु झालेल्या मिट्टी आंदोलनाची सांगता मंगळवारी झाली. क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानात महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. बाबूराव गुरव, ॲड. के. डी. शिंदे आदी उपस्थित होते. मिट्टी सत्याग्रहाअंतर्गत जिल्ह्यात सोनवडे, ऐतवडे, मालगाव, चरण, पलूस, कुंडल, आरळा, बिळाशी, सांगली, सिंदूर, इस्लामपूर, तासगाव, हणमंतवडिये या हुतात्म्यांच्या गावांतून स्मारक स्थळावरील माती गोळा करण्यात आली. सर्व कलश सांगलीत वसंतदादा पाटील यांच्या जेल फोडो आंदोलनातील प्रसिद्ध भिंतीलगत आणले. महेश खराडे, विकास मगदुम, डॉ. संजय पाटील, विद्या स्वामी, कमलताई शिर्के यांनी कलश हाती घेऊन सत्याग्रह केला.
क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानात डॉ. लताताई देशपांडे व नगरसेवक अभिजित भोसले यांच्याहस्ते मातीतून वृक्षारोपण करण्यात आले. यंदा स्वातंत्र्याची पंचाहत्तरी असल्याने वर्षभर इतिहास जागराचे कार्यक्रम करण्याचे ठरले. यावेळी डॉ. रवींद्र व्होरा, मुनीर मुल्ला, संजय कांबळे, धनाजी गुरव, डॉ. विजयकुमार जोखे, ॲड. कृष्णा पाटील, चंद्रकांत वंजाळे, डॉ. मन्नान शेख, रामलिंग तोडकर, परशुराम कुंडले, रोहित शिंदे, महेश माने आदी उपस्थित होते.