लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील वारणा, चांदोली प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, प्रश्न अद्यापही प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहेत. या समस्यांचे जाग्यावरच निराकरण करण्यासाठी जिल्ह्यात १२ जानेवारीपर्यंत विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत माेहिमेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, उपजिल्हाधिकारी विजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. विशेष मोहिमेच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न जागेवरच सोडवून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी मोहिमेदिवशी सकाळी लवकर उपस्थित रहावे व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जागेवरच सोडविण्यास प्राधान्य द्यावे.
चौकट
२१ वसाहतींमध्ये भेट
या मोहिमेअंतर्गत प्रायोगिकस्तरावर कवठेपिरान, इस्लामपूर, बिळाशी, मांगले, आरळा वसाहतींमध्ये आयोजन करण्यात आले होते. आता उर्वरित २१ वसाहतींमध्ये विशेष मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. या २१ वसाहतींमध्ये प्रत्यक्ष गावभेट कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
-----------------
फोटो १० सिटी ०१ एडीटोरियल