सांगली : जिल्ह्यासाठी चिंता वाढवणारी कोरोनाबाधितांची संख्या रविवारी समोर आली. एकाच दिवसात तब्बल ४४ जणांना कोरोनाचे निदान होताना, महापालिका क्षेत्रात सर्वाधिक १७ बाधित आढळले आहेत. १२ जणांनी कोरोनावर मात केली असली तरी बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यापासून सलग रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सरासरी २० च्या प्रमाणात सापडणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होताना रविवारी ४४ रुग्ण सापडले आहेत. सांगलीत ११, तर मिरजेत ६ नवीन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक १० रुग्ण आटपाडी तालुक्यात आढळले आहेत, तर खानापूर तालुक्यात ७ रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य विभागाने आरटीपीसीआरअंतर्गत ६४० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात २८ जण पॉझिटिव्ह आढळले, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ४१० जणांच्या तपासणीतून १८ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
उपचारासाठी दाखल रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली असून सध्या २६३ जण उपचार घेत आहेत. त्यातील ४५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३५ जण ऑक्सिजनवर, तर १० जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. सातारा आणि मुंबईतील एकास कोरानाचे निदान झाले आहे.